आपल्या मित्र-मैत्रिणीत, पिकनिकला, प्रवासात तसेच वाढदिवस, सण-उत्सव या निमित्ताने एकत्र जमल्यावर तुम्ही छान-छान विनोद खास शैलीत सांगितले तर आनंदी वातावरणात हर्षोत्सवाची भर पडेल. म्हणूनच निखळ आनंद देणारे हे खुसखुशीत विनोदी चुटके खास तुमच्यासाठी!
रोडमास्टर बाईकवरून मुंबईतल्या रस्त्यांवर आपले पिळदार दंड दाखवत अगस्ती सुसाट फिरू लागला की, समजावं… कुठेतरी काहीतरी घडलंय…अगस्ती इज इन अॅक्शन! टेक्नोसॅव्ही, सौंदर्याचा भोक्ता, फुडी आणि ऍडव्हेंचरस अगस्ती आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने आणि मनाचा ठाव घेण्याच्या कौशल्याने कल्पनाही करू शकणार नाही अशी काळोखी रहस्यं अशा प्रकारे उजागर करतो की, आपण थक्क होऊन म्हणतो, ‘हॅट्स ऑफ यार अगस्ती!’
भारतीय जनता पक्षाचा सत्तेपर्यंत पोचण्याचा खऱ्या अर्थाने प्रवास सुरु झाला तो १९९० च्या ‘सोमनाथ ते अयोध्या’ रथयात्रेपासून… तेव्हा ‘भाजप’चं नेतृत्व होतं वाजपेयी अडवाणी यांच्याकडे. नंतर १९९८ पासून सहा वर्षं सत्तेवर राहिल्यानंतर २००४ साली ‘भाजप’ला सत्तेवरून पायउतार व्हावं लागलं… आणि तेव्हापासून पक्षसंघटना ढवळून निघायला सुरुवात झाली . पुढे नरेंद्र मोदी व अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली अधिक आक्रमक होत , ‘भाजप’ ने २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवली… आणि हा पक्ष पुन्हा सत्तारूढ झाला… व तेथून ‘भाजप २.०’ची सुरुवात झाली . २०१४ च्या निवडणूकीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे मोदी यांनी ‘वाराणसी’ येथूनही लोकसभेची जागा लढवली आणि त्याच जागेचं प्रतिनिधित्व कायम ठेवलं…
हा सर्व प्रवास ज्येष्ठ पत्रकार प्रकाश अकोलकर यांनी ‘दिसलं तसं… बघितलं जसं’ या शैलीत पुस्तकात मांडला आहे. पंचवीस वर्षांचा हा प्रवास सांगता – सांगता अकोलकर दीनदयाळ उपाध्याय, शामा प्रसाद मुखर्जी, जनसंघ… अशा पूर्वेतिहासाचाही आढावा घेतात आणि या सर्व प्रवासाचं वस्तुनिष्ठपणे विश्लेषणही करतात.
स्वयंपाकघर एक प्रयोगशाळा…
विविध उपकरणे आणि रसायने यांनी समृद्ध अशा या ‘प्रयोगशाळेत’ आपण दररोज अनेक पदार्थ करत असतो. कळत-नकळत कित्येक वैज्ञानिक-क्रिया साधत असतो. पदार्थ उत्तमरीत्या जमणं वा बिघडणं यामागची कारणं विज्ञानातच असतात!
धान्य-कडधान्यं, भाज्या, तेल-तूप, चहा-कॉफी, मसाले आदी जिनसांबाबत शास्त्र काय सांगते?
प्रत्येक कृतीमध्ये काय शास्त्र असते?
विविध पदार्थांच्या कृतीमध्ये कोणत्या वैज्ञानिक प्रक्रिया दडलेल्या असतात?
आहारातील रुचकरपणा राखून त्यातील पोषणमूल्ये कशी वाढवता येतील?
विविध उपकरणांची निगा राखून त्यांचा सुयोग्य वापर कसा करता येईल?
डॉ.वर्षा जोशी यांनी ही सर्व माहिती या पुस्तकात मनोवेधकरीत्या सांगून अनेक उपयुक्त सूचनाही दिल्या आहेत.
आहाराबाबत विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन आणि आरोग्यविषयक जाणिवा विकसित करून मार्गदर्शन करणारे पुस्तक…
स्वयंपाकघरातील विज्ञान!
पातंजल योगसूत्रे’ हा महर्षी पतंजलींनी सिध्द केलेला भारतीय योगपरंपरेतील महत्त्वाचा ग्रंथ होय. चार पादात विभागलेल्या या ग्रंथात अष्टांग योगसाधनेची सूत्रात्मक पध्दतीने समग्र मांडणी केलेली आहे.
वायु पुराणात सूत्राची व्याख्या दिलेली आहे. ती व्याख्या अशी- ‘स्वल्पाक्षरं असंदिग्धं सारवत् विश्वतोमुखम्..’ अर्थात् कमीतकमी अक्षरे, मांडणीतील असंदिग्धता, विषयाच्या साराने संपृक्त असलेली रचना आणि अर्थाच्या प्रकटनासोबत अभ्यासकाला विषयविश्वाकडे अभिमुख करणे ही सूत्राची वैशिष्टये होत. व्याख्येत वर्णन केलेल्या सर्व गुणांनी ‘पातंजल योगसूत्रे’ मंडित आहेत.
कोणत्याही टप्प्यावरच्या योगसाधकासाठी पातंजल योगसूत्रांचा अभ्यास आवश्यक असतो. साधनेतील प्रत्येक टप्प्यावर ही सूत्रे साधकासाठी नवा अर्थ घेऊन सामोरी येतात आणि साधकाची साधना अधिकाधिक सघन करत जातात हा या सूत्रांचा महत्त्वाचा विशेष आहे.
गेली ऎंशी वर्षे योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार अप्रतिहतपणे योगसाधनेत गढलेले आहेत. त्यांच्या या दीर्घ साधनेतून त्यांना प्रतीत झालेला योगसूत्रांचा अन्वय या ग्रंथात त्यांनी अचूकपणे आणि सोप्या भाषेत योगसाधकांसाठी तसेच योगप्रेमींसाठी मांडलेला आहे.
मेंदू आणि त्याला जोडून असलेला मणका हे आपल्या शरीरातील अत्यंत महत्त्वाचे; तितकेच नाजूक अवयव. पण त्यांच्या आजारांबद्दल, त्यावरील उपचारांबद्दल आपल्याला फार कमी माहिती असते. याबद्दल जनजागृती व्हावी या उद्देशाने प्रदीर्घ अनुभव असलेले न्यूरोसर्जन डॉ. जयदेव पंचवाघ यांनी हे पुस्तक लिहिलं आहे. ते या पुस्तकातून मेंदू व मणक्याशी संबंधित आजार, त्यांची लक्षणं, कारणं आणि त्यावरील योग्य उपचार यांची ओळख सहजसोप्या भाषेत करून देतात.
पुस्तकातले काही महत्त्वाचे विषय –
ब्रेन ट्यूमर
चेहऱ्याची असह्य वेदना (ट्रायजेमिनल न्यूराल्जिया)
डोळा मारण्याचा आजार व त्यावरील उपचार वरदान ठरलेली एमव्हीडी शस्त्रक्रिया
एमआरआयचं तंत्रज्ञान
स्लिप डिस्क
मेंदूचं कामशास्त्र
साठीनंतरची मणक्याची शस्त्रक्रिया इत्यादी….
मेंदू आणि मणका यांची कार्य, त्यांचे आजार आणि त्यावरील शस्त्रक्रिया यांबद्दल तसेच त्या अनुषंगाने रंजक, उद्बोधक आणि उपयुक्त माहिती देणारं पुस्तक
एकूण आठ कथांचा हा वाचनीय असा कथासंग्रह. या कथा अतिशय तरल आणि जीवन जगायला शिकवणाऱ्या आहेत. आपल्या रोजच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना, पात्र या कथांमध्ये भेटत राहतात. गुंगवून टाकणाऱ्या शैलीतून लेखिका शोभा भालेकर घराघरातल्या अनेक बोलक्या कहाण्या सांगतात. काही पात्रांमध्ये आपण आपल्यालाच शोधत राहतो तर काही प्रसंग जे आपल्याही आयुष्यात घडून गेलेले असतात त्यांचाही आपल्याला पुनःप्रत्यय येत राहतो, तसे प्रसंग नव्याने समोर आल्यामुळे आपण काहीसे चकितही होतो. आपण थोड्या सकारात्मकतेने, संवेदनशीलतेने जर आयुष्य बघू लागलो तर किती सुंदर, लोभसपणे जगता येऊ शकेल याची प्रचीती नकळतपणे कथांमधून येत जाते. प्रत्येक वाचकाला गुंतवून ठेवणारा विविधरंगी कथांचा संग्रह….
कधीही न झोपणारं महाशहर म्हणजे मुंबई ! मुंबईत रात्र होते म्हणजे नेमकं काय होतं ? रेल्वेची धडधड बंद होते . रस्त्यावरची रहदारी कमी होते . रिक्षा – टॅक्सीची भाडी दीडपट होतात . दुकानं बंद होतात . गोंगाट , गोंधळ थांबतो . एक जग झोपी जातं आणि एक वेगळंच जग जागं होतं … आणि ही जागृतावस्था ती वर्तमानपत्राच्या निमित्ताने ! रिक्षा – टॅक्सीवाल्यांपासून ते पान टपरीवाल्यांपर्यंत … चहावाल्यांपासून ते वेश्यांपर्यंत … कॉल सेंटरवाल्यांपासून वृत्तपत्र व्यावसायिकांपर्यंत … रात्रीचा दिवस करणाऱ्या या जगाची शब्दचित्रं … लेट नाइट मुंबई !
गहाण पडलेली इस्टेट सोडवून घेऊन यशवंतराव आणि त्यांचं कुटुंब दुमजली वाड्यात राहायला येतं … … आणि मग सुरू होतो … भयप्रद आणि गूढ गोष्टींचा अनाकलनीय खेळ ! गांगरून टाकणारा भासांचा लपंडाव !! यशवंतरावांचा परिवार , दोन भाडेकरू , गूढ व्यक्तिमत्त्वाचे डॉ . नागराणी , रहस्यमय पद्धतीने मृत्यू पावलेल्या त्यांच्या पत्नी उमाबाई , सतत भीतीच्या छायेत वावरणारा त्यांचा भाचा मुकुंद पित्रे , यांच्याभोवती फिरणारं कथानक एका मोठ्या रहस्यभेदापर्यंत येऊन पोचतं … कोणाचा भास होत राहतो ? कोण वावरतंय त्या वाड्यात ? एक थरारक भयकथा अंगारिका ! विख्यात भयकथा , गूढकथा आणि विज्ञानकथा लेखक नारायण धारप यांची सर्वच वयाच्या वाचकवर्गाला गुंगवून टाकणारी कादंबरी !
विश्वविख्यात चित्रपट दिग्दर्शक सत्यजित रे यांनी फॅन्टॅस्टिक फेलूदाच्या मूळ रहस्यकथा बंगालीत लिहिल्या आहेत. गुप्तहेर फेलूदा, तोपशे, जटायू या मध्यवर्ती व्यक्तिरेखांभोवती चित्तथरारक व उत्कंठावर्धक अशा १२ कादंबर्या गुंफल्या आहेत. यात रहस्य आहे पण अनाकलनीय गूढ नाही, हिंसा आहे पण हिंस्त्रपणा नाही.
या कथा चित्तथरारक आहेत पण यात भडकपणा नाही. गुंतागुंतीच्या या खिळवून टाकणार्या कथा भारतातील विविध राज्यात, शहरात घडतात असं दाखवून सत्यजित रे यांनी रहस्य, साहस व पर्यटन यांचा रंजक मिलाफ साधला आहे. प्रथितयश अनुवादक अशोक जैन यांनी अनुवादित केलेल्या या कादंबर्या केवळ किशोरवयीनांनाच नव्हे तर आबालवृद्धांनाही खिळवून ठेवतील हे निश्चित!
या अनेकपदरी कथेचं कथानक चिन्मय, त्याचे आई-वडील, मैत्रीण, सामाजिक कार्यकर्ते अशा व्यक्तीपासून लालबाबाचा दर्गा, त्याचा शेजारचा म्हसोबा, दखनी भाषा यांनी वेगवेगळ्या कोनांतून केलेल्या कथनांद्वारे उलगडत जातं. ट्विटरवरचं चिन्मयचं अकाऊंट, व्हॉट्सअॅप, ‘लोकमत’ इतकेच नव्हे, तर कारसेवेसाठी बाभूळगावातून गेलेली एक वीट हेदेखील आपापल्या कथनांमधून स्वतःचं अंतर्विश्व उघड करतात.
एक रहस्यकथा सांगता सांगता भोवतालच्या गुंतागुंतीच्या सामाजिक परिस्थितीची उकल करण्याचा प्रयत्न ही कादंबरी करते. ती वाचताना उत्तरोत्तर वाढत चाललेल्या धार्मिक कट्टरपणाच्या उन्मादी वातावरणात आपण कोणत्या मूल्यांचा वारसा हरवून बसतो आहोत, याचं भान वाचकाला येतं.. ‘हिंदू’, ‘मुस्लिम’ या कप्पेबंद अस्मितांच्या पलीकडे जाणाऱ्या सामायिक, सांस्कृतिक धाग्यांनी बनलेल्या ‘भारतीयत्वा’ चा शोध ही कादंबरी घेते. हिंदू-मुस्लिम सहजीवनाची कल्पना मूळच्या सोशिक, उदार, सहिष्णु अशा पारंपरिक लोकधर्माला अनुसरल्याने प्रत्यक्षात येईल की त्यासाठी आधुनिक मूल्यांचा अंगीकार करणं गरजेचं आहे, असा कळीचा प्रश्न लेखकाने या कादंबरीत उपस्थित केला आहे.