फॉन्ट साइज वाढवा

अभिजन आणि बहुजन हा संघर्ष केवळ सामाजिक-राजकीय पातळीवर नसतो; किंबहुना त्यापेक्षा अधिक तो सांस्कृतिक पातळीवर असतो. कारण परंपरेतून झिरपत जाणारा संस्कृतीचा प्रभाव समाजात खोलवर रुजतो आणि वर्षानुवर्षं टिकतो. त्यामुळेच अभिजनांनी पूर्वापार बहुजनांची दैवतंच आपलीशी केलं असं नाही, तर त्यांच्या संगीत-नृत्यादी कलाही आत्मसात केल्या. पण कालौघात या देवतांवर आणि कलांवर चढलेली, देवत्वाची नि शास्त्राची ‌पुटं खरवडून काढली की त्यांचं मूळ रूप झळझळीतपणे सामोरं येतं; नव्हे त्या देवता आणि कला आपल्या मूळ उद्गात्यांचा जयघोष अधिक उच्चरवाने करू लागतात. प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना डॉ. यशोदा राव-ठाकोर यांनी २०१५मध्ये मध्यप्रदेशातील खजुराहो येथील नृत्यमहोत्सवात पहिल्यांदा ‘देवदासी नृत्य’ सादर केलं, तेव्हा हेच झालं. अभिजनांनी कुचिपुडी, विलासिनीनाट्यम आणि भरतनाट्यमसारख्या भल्याभल्या नावांनी गौरवलेल्या शास्त्रीय नृत्यांचं मूळ रूप त्यांच्या ‘देवदासी नृत्या’तून उघडं पडत गेलं. थेट ‘देवदासी नृत्य’ या नावाने सादर होणारा तो बहुधा भारतातील नृत्याचा पहिलाच जाहीर कार्यक्रम होता आणि त्यामुळेच यशोदा राव-ठाकोर नेमकं काय सादर करतायत, याची उपस्थितांना उत्सुकता होती. मात्र त्यांनी जेव्हा आंध्रप्रदेशातील कलावंतुलु समाजातील देवदासी महिला सादर करत असलेलं पारंपरिक देवदासी नृत्य सादर केलं, तेव्हा सारेच भारावून गेले. कारण ते नृत्य आताच्या तथाकथित शास्त्रीय नृत्यांसारखं नसलं, तरी त्याच्या मुळाशी गाण्यातील राग-संगीतापासून नृत्यातील अतिशय आकर्षक अशा हावभावापर्यंत सारं काही होतं. किंबहुना शास्त्रीय नृत्याचा हा पाया आहे, हे सहज जाणवण्याइतकं बरंच काही त्या ‘देवदासी नृत्या’त होतं. नव्हे, हे ‘देवदासी नृत्य’ हाच भारतीय शास्त्रीय नृत्याचा पाया आहे, हे सिद्ध करण्यासाठीच तर डॉ. यशोदा राव-ठाकोर यांनी या देवदासी नृत्याचा घाट घातला होता… आणि आता तर या ‘देवदासी नृत्या’ला प्रतिष्ठा मिळवून देणं, हेच त्यांनी आपलं जीवितकार्य मानलेलं आहे. केवळ देवदासी नृत्यालाच नाही, तर आंध्र-तेलंगणातील ‘कलावंतुलु’ या मूळ कलावंत असलेल्या समाजालाच पुन्हा पहिली प्रतिष्ठा मिळावी, अशी त्यांची इच्छा आहे. कारण हा कलावंतुलु समाज म्हणजे पूर्वापार चालत आलेल्या देवदासी प्रथेतून आकाराला आलेला समाज आहे आणि त्या स्वतःही या देवदासी परंपरेतीलच आहेत. ‘देवदासी’ हा शब्द अलीकडच्या काळात अगदी बदनाम झालेला आहे. त्यामुळेच कुणीही आपण या परंपरेतील आहोत हे जाहीर करत नाही. उलट आपला कलावंत घराण्याचा वारसा लपवण्याकडेच सगळ्यांचा कल असतो. अशा पार्श्वभूमीवर काही वर्षांपूर्वी डॉ. यशोदा राव-ठाकोर यांनी जाहीरपणे सांगितलं की-

‘हो, मी देवदासी परंपरेतून आलेली आहे आणि मी कलावंतुलु समाजातील असल्याचा मला सार्थ अभिमान आहे.’

खरंतर धार्मिक बाब म्हणून कधी काळी भारतातील मंदिरांत देवाच्या सेवेसाठी म्हणून देवदासी प्रथेला प्रारंभ झाला. या सेवांअंतर्गत या देवदासी कधी गाणं म्हणून, तर कधी नृत्य करून देवाचं मनोरंजन करू लागल्या. मंदिरातली ही संगीत-नृत्याची परंपराच कालांतराने राजदरबारात जाऊन स्थिरावली. जेव्हा स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, तेव्हा केवळ या देवदासीच होत्या, ज्यांना अपवादात्मक स्थितीत लिहिण्या-वाचण्याचा अधिकार होता. त्या अधिकारातूनच आधी मंदिरात आणि नंतर दरबारात आपली सेवा रुजू करताना त्यांनी आपल्या कलांचा परिपोष केला. आपली संगीत-नृत्यकला ‘कला’ या अभिधानापर्यंत पोचवली. मात्र त्यांच्या ‘देवदासीनृत्या’तूनच नंतरच्या काळात उन्नत पावलेल्या भरतनाट्यम, ओडिसी, मोहिनीअट्टम, कुचीपुडी यांसारख्या शास्त्रीय नृत्यांत आज मूळ देवदासी नृत्याची साधी झलकही पाहायला मिळत नाही. किंबहुना अधिकतर मूळ ओळख लवपण्याचाच प्रयत्न केला जातो. कारण ‘देवदासी नृत्य’ म्हटलं की या शास्त्रीय नृत्यांच्या प्रतिष्ठेला बाध येतो. या खोट्या प्रतिष्ठेचा बुरखा फाडण्याचंच काम यशोदा राव-ठाकूर यांनी पहिल्यांदा ‘खजुराहो नृत्य महोत्सवा’त केलं आणि आता तर तेच त्यांच्या आयुष्याचं साध्य बनलं आहे.

यशोदा राव-ठाकोर या मूळच्या कुचिपुडीनर्तिका. वयाच्या सहाव्या वर्षापासून सलग चौदा वर्षं त्या कुचिपुडी नृत्य शिकल्या. परंतु नृत्यात एम.ए. करत असतानाच एकदा त्यांनी मदुरालक्ष्मी नारायणन या ८० वर्षांच्या देवदासीचं नृत्य पाहिलं. त्या वेळी मदुरालक्ष्मींनी सलग चार तास ‘पदम’ (काव्य) वर केलेल्या अभिनयाने यशोदा भारावून गेल्या. कारण त्या चार तासात मदुरालक्ष्मी यांनी वेगवेगळ्या पदांवर कायिक, वाचिक आणि मौखिक अभिनयाचे अक्षरशः असंख्य प्रकार करून दाखवले. पदमवर केवळ बसून करण्यात येणाऱ्या अभिनयामुळे यशोदा राव या देवदासी नृत्याकडे ओढल्या गेल्या. त्याच वेळी देवदासी परंपरेतील या नृत्याचा अभ्यास करून, प्रसिद्ध कुचिपुडी नृत्यांगना स्वप्नसुंदरी यांनी ते विलासिनीनाट्यम म्हणून रंगमंचावर सादर करायला सुरुवात केली होती. त्यामुळे मूळ देवदासींचं असलेलं हे विलासिनीनाट्यम यशोदा यांनी स्वप्नसुंदरी यांच्याकडे शिकायला सुरुवात केली. मात्र स्वप्नसुंदरी यांच्याकडे ‘विलासिनीनाट्यम’ शिकत असतानाच देवदासीनृत्याला त्या देत असलेलं आधुनिक रूप त्यांना खटकायला लागलं. त्यांना देवदासीनृत्याच्या मुळाशी जायचं होतं. त्यातूनच मग त्यांनी देवदासीनृत्याची परंपरा शोधायला, तपासायला सुरुवात केली आणि जेव्हा त्या त्याच्या मु‍ळाशी पोचल्या, तेव्हा देवदासीनृत्याच्या अंगभूत सौदर्याने त्यांना दिपवून टाकलं.

महत्त्वाचं म्हणजे या अभ्यासाने यशोदा राव-ठाकोर यांना तंजावरच्या कलासक्त भोसले राजांपर्यंत पोचवलं. शिवाजीमहाराजांचे सावत्रभाऊ व्यंकोजी ऊर्फ एकोजीराजांनी तंजावरच्या नायकराजाचा पराभव केला आणि ते तिथेच स्थायिक झाले. त्यांच्या पश्चात तंजावरच्या गादीवर शहाजी, प्रतापजी, तुळोजी, सरफोजी… जेवढे भोसलेराजे होऊन गेले, त्या सा‍ऱ्यांनी स्थानिक संगीत-नृत्यकलेला प्रोत्साहन दिलं. त्यातच चोल राजवटीपासून दक्षिणेकडील मंदिर परिसरात देवदासींकडून जोपासल्या गेलेल्या गायन-नृत्य कलेलाही त्यांनी मदत केली.

एवढंच नाही, तर देवदासींना त्यांनी राजाश्रयही दिला. त्यांच्या दरबारात म्हणजेच सदरेत हे देवदासीनृत्य म्हणजेच देवदासीआटम (आटम म्हणजे खेळ) सादर होऊ लागलं, त्यामुळे त्याला सादिरआटम असं नाव मिळालं. भोसल्यांच्या राजवटीत स्थानिक भाषा तमिळ होती, तर भोसल्यांच्या आधीचे नायकराजे तेलुगु असल्यामुळे राजभाषा तेलुगु होती. साहजिकच देवदासीनृत्याची सगळी पदं तेलुगु आणि तमिळ भाषेत होती. मात्र भोसलेराजांनी आपली जेत्यांची मराठी भाषा स्थानिक समाज व कलावंतांवर न लादता, उलट त्यांची भाषा शिकून घेतली. त्यामुळेच तंजावरच्या अनेक भोसलेराजांनी या सादिरआटमसाठी तेलुगु-तमिळ-मराठी भाषेत लिहिलेली पदं सापडतात. तंजावरच्या मराठा राजांनी देवदासीनृत्याला दरबारात स्थान दिलं म्हणूनच त्यावरून विकसित झालेलं भरतनाट्यमचं शास्त्रोक्त रूप आज पाहायला मिळत आहे.

परंतु देवदासीआटम ते भरतनाट्यम हे परिवर्तन होताना, मूळ कलावंतसमाजाचं अस्तित्वच पुसलं गेलं. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात रुक्मिणीदेवी अरुंडेल यांनी गौरीअम्मा या देवदासीकडून भरतनाट्यम शिकून घेतलं. मात्र या नृत्याला तथाकथित अभिजन समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी देवदासींच्या पारंपरिक नृत्यातील आक्रमकता, शृंगारिकता काढून टाकली. परिणामी आज दक्षिणेकडे भरतनाट्यम या शास्त्रीय नृत्यप्रकारावर ब्राह्मण समाजाचं वर्चस्व आहे. रुक्मिणीदेवी अरुंडेल यांना त्या वेळी टी. बालसरस्वती या जगप्रसिद्ध नर्तिकेने जोरदार विरोध केला होता. कारण बालसरस्वती स्वतः देवदासीपरंपरेतील होत्या. त्यांची आजी वीणाधनम्माळ या तंजावरच्या दरबारच्या प्रसिद्ध वीणावादक होत्या आणि बालसरस्वती परंपरेनं चालत आलेलं नृत्यच शिकल्या होत्या. विशेष म्हणजे ‘अभिनय’ ही बालसरस्वती यांचीही खासीयत होती. ही ‘अभिनय’परंपरा जोपासण्याचाच प्रयत्न यशोदा राव-ठाकोर करत आहेत.

खजुराहो नृत्यमहोत्सवात यशोदा राव-ठाकोर यांनी मुद्दाम देवदासीपरंपरेतला शृंगाररसाने ओतप्रोत भरलेला ‘अभिनय’ कलाप्रकार सादर केला होता. तो बघताना आश्चर्याचा धक्काच बसला होता. कारण देवदासीपंरपरेतील हा ‘अभिनय’प्रकार, महाराष्ट्रातल्या बैठकीच्या लावणीशी कमालीचं साधर्म्य असणारा होता. महाराष्ट्रात ज्याप्रमाणे गोदावरी पुणेकर, भामाबाई पंढरपूरकर, यमुनाबाई वाईकर, गुलाबबाई संगमनेरकर यांनी परंपरेतून आलेल्या इरसाल चावट लावण्या आपल्या अप्रतिम अदाकारीने कलेच्या पातळीवर पोचवल्या, त्याचप्रमाणे यशोदा राव-ठाकोर शरीराच्या अंगप्रत्यंगाचं रसभरीत वर्णन करणा‍ऱ्या शृंगारिक तेलुगु पदमवर सुरेख भावकाम करत होत्या. त्याही बैठकीच्या लावणीप्रमाणेच बसून पदमवरचा अभिनय सादर करत होत्या. महत्त्वाचं म्हणजे त्या पदममधला आशय अभिजनांच्या दृष्टीने अतिशय चावट असतानाही, त्यांनी आपल्या संयत, पण ठोस सादरीकरणातून अभिनयाचा नितांतसुदर आविष्कार घडवला. किंबहुना आज अभिनय ही संज्ञा रंगभूमीवरील अभिनेत्यासाठी मुख्यत्वे वापरली जात असली, तरी ती मूळ देवदासी बसून सादर करत असलेल्या पदमवरील ‘अभिनय’ या प्रकारासाठी असावी, असं क्षणभर वाटून गेलं.

रंगमंचावर आल्यावर सर्वप्रथम गणेशवंदना किंवा सरस्वतीवंदना करण्याची प्रथा आहे. पण यशोदा राव यांनी तिथेही देवदासी नृत्यपरंपरेतील सलामनृत्य केलं. सलाम म्हणजे एक प्रकारचा देवाला किंवा ज्या राजाने आश्रय दिला, त्या राजाला केलेला सलाम. यशोदा राव यांनी सादर केलेल्या सलामनृत्याची खासीयत म्हणजे तो सलाम तंजावरच्या भोसलेराजांना केलेला होता. याचं कारण सांगताना त्या म्हणाल्या होत्या, ‘तंजावरच्या भोसलेराजांनी ही देवदासी नृत्याची परंपरा जोपासली. त्यामुळे देवदासींच्या अनेक तमिळ-तेलुगु पदांत त्यांना सलाम केलेला आहे.’

आपल्या नृत्याचा शेवटही यशोदा राव यांनी तेव्हा मुद्दाम जावळीनृत्याने केला. हे जावळीनृत्यही देवदासीनृत्यातील एक मुख्य नृत्यप्रकार होता. पण तो काहीसा आक्रमक आणि शृंगारिक असल्यामुळे, जेव्हा देवदासीनृत्याची नव्याने मांडणी करण्यात आली, तेव्हा त्यालाही फाटा देण्यात आला. पण भरतनाट्यम, कुचिपुडी किंवा विलासिनी नाट्यममध्ये मूळ देवदासी नृत्यपरंपरेतील जे-जे बाजूला सारण्यात आलं, त्याला यशोदा राव-ठाकोर यांनी आपल्या देवदासी नृत्यात स्थान दिलं आहे. इतकंच नाही तर, संशोधनातून सिद्ध केलेल्या नृत्याला त्यांनी ‘देवदासी नृत्य’ असंच नाव दिलं. त्या म्हणतात, ‘देवदासी परंपरेतील महिला या नृत्याला आमची कला एवढंच म्हणतात. त्यांनी या नृत्याला काहीही नाव दिलेलं नाही. म्हणून मग मीच या नृत्यकलेचं नाव देवदासी नृत्य असं केलं. तसंच आज वेगवेगळ्या शास्त्रीय नृत्यप्रकारासाठी जी केशभूषा, वेशभूषा केली जाते तीही मी नाकारली. कारण ती अलीकडच्या काळातली आहे. पूर्वी देवदासी नेहमीची साडी कंबरेला खोचूनच नृत्य सादर करीत असत. म्हणून मीही ती नैसर्गिक पद्धतच अवलंबली आहे.’

भारतीय नृत्यपरंपरा जोपासणा‍ऱ्या देवदासींच्या कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा यशोदा राव-ठाकोर यांचा प्रयत्न आहे. मुख्य म्हणजे अश्लीलतेचं लेबल लावून तुम्ही एखाद्या गोष्टीला बाद कसं करू शकता? असा त्यांचा सवाल आहे. कारण गाण्यातला-पदांतला आशय अश्लील वा शृंगारिक असला, तरी तो नृत्यातून सादर करताना देवदासी नृत्यकलेचा उच्च प्रतीचा आनंद देत असते. मग आशय महत्त्वाचा मानणार की अभिव्यक्ती? असं त्यांचं म्हणणं आहे. त्यांनी स्वतः देवदासींची अभिव्यक्ती महत्त्वाची मानली आणि आता त्या अभिव्यक्तीचा प्रसार त्या करत आहेत. शास्त्रीय नृत्यांच्या मुळाशी असलेल्या देवदासी नृत्याला आणि ते सादर करणाऱ्या त्यांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून द्यायची आहे. अभिजनांनी लाटलेली बहुजनांची नृत्यकला त्यांना मुक्त करायची आहे.

– डॉ. मुकुंद कुळे

RohanSahityaMaifaljpg-1-1
Sundarabai
या सदरातील लेख…

‘बाई’ सुंदराबाई

बाई सुंदराबाईंनी एवढं वैविध्यपूर्ण गायन केलं, तरी त्यांची आज जनमानसातली ओळख आहे ती, बैठकीची लावणी गाणारी गायिका म्हणूनच!

लेख वाचा…




देवकन्या!

ते केवळ गायन नव्हतं, तो सुब्बुलक्ष्मींचा सतत चाललेला रियाझ होता – आपलं गाणं देवाप्रति पोचवण्याचा!

लेख वाचा…


एकलीच बशिल्ली मेनकाबा

आयुष्याचं उत्तरपर्व गोव्यातील फोंड्याच्या शांतादुर्गा मंदिराजवळ असलेल्या स्नेहमंदिर वृद्धाश्रमात व्यतीत करणाऱ्या प्रसिद्ध गायिका-नर्तिका मेनकाबाई शिरोडकरही अशाच झुरल्या असतील का आपल्या माणसांसाठी?

लेख वाचा…


आर्यगंधर्व

बालगंधर्वांनाही ज्यांच्या लावण्या प्रिय होत्या, त्या कौसल्याबाई कोपरगावकर यांची नावनिशाणीच आज कालपटलावरून पुसली गेली आहे, जणू काही कौसल्याबाई झाल्याच नाहीत…

लेख वाचा…


विद्यासुंदरी

शरीराची गरज असेपर्यंत आश्रय द्यायचा आणि ती भागली की वाऱ्यावर सोडायचं, या पुरुषी वृत्तीचा तिला वीट आला नि संतापानेच तिने निश्चय केला- आता नागरत्नम्माला मोठी कलावंत करायचं !

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

भामाबाईंच्या कलेचं कोणत्याच प्रकारचं दस्तऐवजीकरण आज उपलब्ध नाहीय. परंपरेतील माणसं त्यांचं नाव घेताना आजही कानाला हात लावतात, हेच भामाबाईंचं मोठेपण! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतलं मानाचं पान

थोड्याच काळात रसूलन एखाद्या जाणत्या गायिकेसारखी गायला लागली. बघता बघता बनारस घराण्याची आन-बान-शान बनली! 

लेख वाचा…


बैठकीच्या लावणीतला टवटवीत ‘गुलाब’

…आणि अवघ्या बारा-तेरा वर्षांच्या गुलाबबाई ‘गुलाबबाई संगमनेरकर संगीतबारी’च्या मालकीण झाल्या.  

लेख वाचा…


जगन्नाथाची शेवटची धर्मपत्नी

…ती होती पुरीच्या जगन्नाथाची शेवटची देवदासी, त्याची अखेरची धर्मपत्नी… 

लेख वाचा…


गौरीअम्मा : कलेची गंगोत्री

तरीही आमच्या कलाजगताला गौरीअम्माविषयी फार काही ठाऊक नाही. असणार तरी कसं म्हणा? शेवटी गौरीअम्मा बोलूनचालून एक देवदासी तर होती…  

लेख वाचा…


विद्याधरीबाई : बनारसची शानो शौकत!

मुळात विद्याधरीबाईंच्या स्वभावात जात्याच मार्दव होतं. त्यामुळे गाणं असो वा व्यवहारातलं वागणं ते कधी एकमेकांपासून दूर गेलं नाही.  

लेख वाचा…


मुद्दुपलनी आणि तिचं शृंगारकाव्य…

भारतीय शृंगार साहित्यात मुद्दुपलनीचं ‘राधिका सांत्वनमु’ हे शृंगारकाव्य आगळवेगळं आहे, कारण ते पुरुषाऐवजी एका स्त्रीने लिहिलेलं आहे. 

लेख वाचा…


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *