जयप्रकाश प्रधान यांनी तब्बल ७३ देश पालथे घातले आहेत. या पुस्तकातून ते वाचकांना अद्भुत दुनियेची, वैशिष्ट्यपूर्ण अशा जरा हटके स्थळांची सफर घडवतात, आगळ्या-वेगळ्या अनुभवांची प्रचीती देतात. नेहमीच्याच पर्यटनस्थळांच्या प्रवासवर्णनापेक्षा ऑफबीट पर्यटनाचा रोमांचकारी आनंद देणारी ३ पुस्तकं…
ऑफबीट भटकंती सप्रेम भेट संच !
महाराष्ट्राच्या लोकप्रिय सुपुत्राचा परिचय, त्यांनी केलेल्या राजकीय क्षेत्रातील योगदानाची माहिती आजच्या पिढीला विशेषत: तरुणांना व्हावी या दृष्टीने यशवंतरावांच्याच लेखणीतून साकार झालेली तीन पुस्तकं- ‘कृष्णाकांठ’, ‘भूमिका’ व ‘ॠणानुबंध’ रोहन प्रकाशनातर्फे पुनर्प्रकाशित करण्यात आली आहेत.
कृष्णाकांठ म्हणजे यशवंतरावांचा बालपणापासून त्यांच्या राजकीय जडणघडणीपर्यंतचा लक्षवेधक प्रवास! त्यांचं बालपण, स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग, पहिला तुरुंगवास, त्यांचं वकिलीचं शिक्षण, वेणूताईंबरोबरची विवाहगाठ आणि राजकारणातील त्यांचा प्रवेश अशा रोमांचक आणि प्रेरणादायी अनुभवांचा पट यशवंतराव त्यांच्या सहज-सुंदर शैलीतून कृष्णाकांठद्वारे उलगडतात.
‘भूमिका’ हे पुस्तक म्हणजे यशवंतरावांच्या कारकिर्दीचं पुढचं पर्व म्हणता येईल. यशवंतरावांचे राजकीय, सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक प्रश्नांसंबंधीचे विचार या पुस्तकातील विविध लेखांतून वाचायला मिळतात.
यशवंतरावांचा चिंतनाचा प्रमुख विषय जरी राजकारण हा असला तरी गतकाळाकडे वळून बघताना वैयक्तिक जीवनातील काही आठवणी, व्यक्ती व प्रसंग त्यांच्या मनात घर करून राहिले होते. काही जवळची माणसं, स्थळं, भावना व विचार यांच्याशी यशवंतरावांचा एक ऋणानुबंध निर्माण झाला होता. त्या साऱ्याचं ओघवतं शब्दांकन म्हणजे ‘ऋणानुबंध’ हे पुस्तक!
आधुनिक महाराष्ट्राची पायाभरणी करून देशपातळीवर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या यशवंतराव चव्हाणांनी तीन खंडांमधून आत्मचरित्र लिहिण्याचे ठरवले होते. प्रत्यक्षात त्यातील एकच खंड प्रकाशित होऊ शकला. प्रा. जयंत लेले यांच्या प्रदीर्घ मुलाखतसत्रांतून आकारास आलेला प्रस्तुत ग्रंथ म्हणजे एका अर्थाने यशवंतरावांनी लेले यांना सांगितलेले आत्मचरित्र म्हणावे लागते. ‘‘हा मी स्वत:शी करत असलेला संवाद आहे” असे स्वत: यशवंतरावच म्हणतात यात सारे काही आले. यशवंतरावांचे राज्य व राष्ट्र या दोन्ही पातळ्यांवरचे राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक दृष्टिकोन आणि व्यवहार यांचा हा सखोल अभ्यास आहे. विशेष म्हणजे हा अभ्यास जागतिक पातळीवरील स्थित्यंतरांच्या संदर्भात करण्यात आलेला असल्याने तो एकमेवच मानावा लागतो. आपण मनापासून स्वीकारलेली स्वातंत्र्य आणि समता ही तत्त्वे एकीकडे व प्रत्यक्ष राजकीय व्यवहार दुसरीकडे. तर प्रसंगी स्वातंत्र्य आणि समता या तत्त्वांमधील द्वंद्वावर मात करण्याची यशवंतरावांची धडपड लेले यांनी हळुवारपणे उकलली आहे. चव्हाण साहेबांची राजकीय भूमिका व शैली यांच्यासाठी त्यांनी केलेला सैद्धांतिक व्यवहारवाद हा शब्दप्रयोग अत्यंत समर्पक म्हणावा लागेल.
स्वातंत्र्यलढ्याच्या दरम्यान झालेली यशवंतरावांची वैचारिक वाटचाल, स्वातंत्र्योत्तर काळात मुंबई राज्याच्या व द्वैभाषिकाच्या कायदेमंडळात घडलेला प्रशासक, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत अविचलपणे राष्ट्रीय व प्रादेशिक हितसंबंधांचा मेळ घालणारा मुत्सद्दी, चिनी आक्रमणामुळे अचानकपणे अंगावर आलेली जबाबदारी पेलणारा खंबीर नेता व विचारवंत असे अनेक पैलू या ग्रंथातून उलगडतात. महाराष्ट्र आणि भारत या दोन्ही स्तरांवरील सहकारी व स्पर्धक यांच्याशी आपल्या मानवी पातळीवरील संबंधांविषयी इतक्या स्पष्टपणे यशवंतराव कधीच बोलले नव्हते. या सर्व गोष्टींचा उपयोग राजकीय आणि सामाजिक क्षेत्रांत वावरणाऱ्यांना तर होईलच पण महाराष्ट्राने यशवंतरावांचा कृतज्ञतापूर्वक अभिमान का बाळगायचा हे देखील समजेल.
डॉ. कलामांनी जे विकसित भारताचं स्वप्न पाहिलं होतं त्याचं तपशीलवार विवेचन या तीनही पुस्तकात वाचायला मिळेल. कलामांच्या विचारांचा प्रसार-प्रचार जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत खास करून तरूण पिढीपर्यंत व्हावा म्हणून त्यांना वाहिलेली ही शब्दांजली…
दैनंदिन चीजवस्तूंचा उगमापासून आजपर्यंतचा कुतूहलजनक प्रवास
अरुण टिकेकर
‘‘वाचक या पुस्तकात गुंततो याला काही कारणं आहेत. एकतर टिकेकरांची रसाळ, गोमटी भाषा. त्यांच्या लेखनाला जुन्या पिढीने कमावलेलं सौष्ठव आहे. इतकी चांगली भाषा हल्ली कुठे वाचायला मिळते? मिळालीच तर त्यात क्लिष्टता, पंडिती जडपणा आणि अभिजात उग्रता असते. पण टिकेकरांच्या या लिखाणात नितांतसुंदर सहजता आहे. ‘माझ्या वाचनात मला ज्या अजबगजब गोष्टी कळल्या त्या तुम्हाला सांगतो,’ असा या लेखनाचा बाज आहे. त्यामुळे वाक्यागणिक नवनवी माहिती आपल्याला कळत जाते आणि आपण या सुग्रास माहितीचा आस्वाद घेऊ लागतो.
दुसरी गोष्ट म्हणजे, टिकेकरांचं वाचन बहुविद्याशाखीय असल्यामुळे त्यांचं लेखन आपल्याला समृद्ध करत जातं. इतिहास, भूगोल, साहित्य, भाषाशास्त्र, समाजशास्त्र, व्युत्पत्तीशास्त्र, मानववंशशास्त्र अशा कितीतरी अभ्यासशाखांतील संबद्ध माहिती ते आपल्याला उलगडून देतात. त्याशिवाय वैद्यक, उद्योग-व्यापार, आहारशास्त्र वगैरेंमधील आवश्यक संदर्भही पुरवतात….
या पुस्तकात रमण्याचं आणखी एक कारण म्हणजे टिकेकरांची मानवी जीवनाविषयीची आतुरता आणि आत्मीयता. मानवी जीवन कसकसं उलगडत गेलं आणि समृद्ध होत गेलं, नाना खाद्यपदार्थ आणि जीवनोपयोगी घरगुती वस्तूंतून ते कसं दिसतं, याचा उलगडा हे पुस्तक वाचताना होतो. विविध धान्य-भाज्या-फळं-पदार्थ-पक्वान्न आणि सुई-आरसा-मच्छरदाणी-पंखा-कात्री-दागिने-भांडीकुंडी अशा जीवनोपयोगी वस्तू यांचा माणसाच्या इतिहासाशी आणि त्याच्या अलीकडच्या विकासाशी असलेला संबंध टिकेकर आपल्याला जोडून दाखवतात….”
शेळ्या-मेंढ्यांसोबत आपला कुटुंबकबिला घेऊन पोटासाठी रानोमाळ भटकणारा एक धनगर आपल्या पोरांना शिकवायचं असा निश्चय करतो, आणि बापाचं हे स्वप्न उराशी घेऊन धनगरवाड्यातलं एक कोकरू बिचकत बिचकत शाळेत जाऊ लागतं…
वादळवारा असो, वा सतत बदलणारा मुक्काम असो, काबाडकष्ट करून ते आपलं शालेय शिक्षण पूर्ण करतं. नंतर शहरामध्ये जाऊन उच्च शिक्षण घेतं. शिक्षणासाठी प्रसंगी मोलमजुरी करून ‘बापाचं स्वप्न पूर्ण करायचंच’ असा निर्धार करतं आणि स्वत:च स्वत:ला प्रेरित करत राहतं!
आत्मभान जागृत झालेल्या एका धनगराचं हे विलक्षण आत्मकथन… या कथनात लेखक धनंजय धुरगुडे धनगर समाजाच्या रूढी-चालीरीती आणि जीवनपद्धती यांचं जिवंत चित्रण करतात. त्यांचे पारंपरिक धनगरी खेळ, गजीनृत्य व सण-उत्सव यांचं शब्दचित्र रेखाटतात, आणि शिक्षणामुळे झालेला आपला विकास सांगत धनगर समाजाचं वास्तववादी दर्शन घडवतात.
एका धनगराने अस्सल धनगरी शैलीत प्रथमच चितारलेला हा – माझा धनगरवाडा!
कुशल लष्करी डावपेच आणि अपरिमित शौर्य यांची ओळख करुन देणारी दोन पुस्तकं…
रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद अनुवाद : भगवान दातार
रचना बिश्त-रावत, मेजर जनरल शुभी सूद
भारताला आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी आजवर १९४७, १९६२, १९६५, १९७१, १९९९ अशी अनेक युद्धं लढावी लागली.
या लढायांत असंख्य लष्करी अधिकारी, जवानांनी आपलं असीम शौर्य सिद्ध केलं. देशासाठी बजावलेल्या या कामगिरीसाठी त्यांतील अनेकांना आजवर विविध सन्मानांनी गौरवण्यात आलं आहे.
अशा काही निवडक सैनिकांच्या वीरतेच्या कहाण्यांची ही २ पुस्तकं…
युद्धभूमीवरील डावपेच व प्रत्यक्ष लढायांच्या तपशिलांसह !
सत्यनारायण गंगाराम पित्रोदा… ओडिशा राज्यातल्या तितिलगड या छोट्याशा गावातला हा तरुण ‘स्वप्नभूमी’ अमेरिकेत गेला काय आणि झपाट्याने विस्तारत जाणार्या तंत्रज्ञानाच्या अवकाशात त्याच्या हाती सोनं लागलं काय! सत्यनारायणचा ‘सॅम’ झाला आणि जागतिक पेटंट्सच्या मालकीमुळे कोट्याधीश बनला…
पण गांधीवादी विचारांचा पगडा असलेल्या सॅमना मात्र आपलं ज्ञान आणि गाठीशी असलेला अनुभव आपल्या मायभूमीसाठी वापरावा अशी आस लागली. आणि म्हणून ते भारतामध्ये परतले, तेच एक ‘महाध्येय’ घेऊन… भारतात ‘टेलिकॉम-क्रांती’ घडवण्याचं ! तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचंही त्यांना समर्थ पाठबळ लाभलं… आणि मग केवळ एक रुपया वेतनावर अविरत कष्ट करणारे सॅम आणि देशाच्या कानाकोपर्यात दिसणारे ‘एसटीडी/पीसीओ बूथ’ म्हणजे एक अतूट समीकरणच होऊन गेलं…!
राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर मात्र सॅम यांचं जगच हादरलं. भ्रष्टाचाराचे आरोप, त्यातच आलेला हृदयविकाराचा झटका आणि आर्थिक कफल्लकता यांमुळे ते खोल गर्तेत बुडाले, पण तरी निराश न होता फिनिक्स पक्ष्याप्रमाणे पुन्हा राखेतून उसळून वर आले…!
भारतीय टेलिकॉम-क्रांतीचं महास्वप्न प्रत्यक्षात आणणार्या सॅम पित्रोदा यांची ही प्रेरक आत्मकथा !
शिष्टाईचे अंतरंग- परराष्ट्र व्यवहार आणि मुत्सद्देगिरीच्या विश्वाचा वेध
विजय नाईक
देशा-देशांतील संबंध जोपासण्यासाठी, वाद मिटवून सामंजस्य निर्माण करण्यासाठी, व्यापार-वृध्दीसाठी, जटिल प्रश्नांची उकल करण्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणात ‘डिप्लोमसी’ला अर्थात शिष्टाईला अनन्यसाधारण महत्त्व असतं. त्याला अनुसरून अनेक भारतीय राजदूत, अधिकारी, नेते आणि मंत्री आपलं कसब पणाला लावत असतात. मात्र, याबाबतचे तपशील गोपनीयतेच्या आवरणामुळे सामान्यजनांपर्यंत पोहोचत नाहीत.
ज्येष्ठ पत्रकार विजय नाईक यांचं राजधानी दिल्लीत गेली पंचेचाळीस वर्षं वास्तव्य आहे. अनेक अधिकृत परदेशी दौर्यामध्ये पत्रकार म्हणून केलेलं प्रतिनिधित्व व या वर्तुळातील वावर यांतून आलेले अनुभव, केलेली निरीक्षणं आणि अभ्यास या सर्वांतून त्यांनी साकार केलेल्या या पुस्तकाद्वारे ही कसर भरून निघत आहे.
नाईक यांनी या पुस्तकात दिल्लीतील ‘चाणक्यपुरी’, ‘शांतिपथ’ येथील विविध देशांच्या वकिलाती, दूतावास यांबद्दल ‘क्लोज-अप’ साधणारी माहिती दिली असून पं. नेहरूंनी घातलेल्या परराष्ट्र धोरणाचा पाया, यशवंतराव चव्हाण यांचं योगदान, गुजराल सिध्दान्त यांसारख्या महत्त्वाच्या टप्प्यांचा वेध घेतला आहे. तसंच त्यांनी आंतरराष्ट्रीय राजकारणातील मुत्सद्देगिरीच्या नाना तऱ्हांची सविस्तर माहिती दिली असून या क्षेत्रात मराठी व्यक्तींनी केलेल्या भरीव कामगिरीचाही आढावा घेतला आहे.
राजदूत, सचिव, राजकीय नेते व मंत्री आदी परराष्ट्र धोरणाशी संबंधित व्यक्तींच्या मुलाखती, भारत-अमेरिका, भारत-रशिया व इतर राष्ट्रांबरोबरच्या संबंधांवर अनुभवी नेते व राजदूत यांनी केलेलं भाष्य या पुस्तकात समाविष्ट केलं आहे. तसंच या क्षेत्रातले काही गंभीर, तर काही हलके-फुलके मजेशीर प्रसंगही सांगितले आहेत.
थोडक्यात सांगायचं तर, स्वातंत्र्योत्तर काळातील मुत्सद्देगिरीच्या विश्वाचा विविधांगी मागोवा घेणारं मराठीतील किंबहुना हे पहिलंच पुस्तक – साउथ ब्लॉक, दिल्ली – वाचकांना एका वेगळया विश्वाचं अंतरंग उलगडून दाखवेल, हे निश्चित!
मुत्सद्दी राजकारणी, विचारवंत आणि एक रसिक व्यक्तिमत्त्व म्हणून चिरपरिचित असलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते देशभरातील विविध विद्यापीठांचे दीक्षान्त समारंभ संपन्न झाले. तेथे केलेल्या शिक्षणाविषयीच्या चिंतनशील भाषणांचं संपादित पुस्तक म्हणजेच – `माझ्या विद्यार्थी-मित्रांनो…’
या पुस्तकातली सगळी भाषणं यशवंतरावांनी उच्च शिक्षण देणारया विद्यापीठांमध्ये दिलेली असली, तरीही त्यात ते प्राथमिक व माध्यमिक शिक्षणाचं महत्त्व ठळकपणे अधोरेखित करतात. शिक्षणाचा हेतू व्यक्तीचा विकास करणं एवढाच मर्यादित नसून त्यातून समाजाचाही विकास व्हायला हवा, ही त्यांची धारणा ते यात मांडतात. म्हणूनच समाजाच्या फार मोठ्या विभागाला शिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन ते वेळोवेळी करतात, जे आजघडीलाही तितकंच लागू होतं.
शहरी व ग्रामीण शिक्षणातील तफावत, विकसित देशांसोबत जाण्यासाठी आवश्यक असणारे आधुनिक शिक्षण, उच्च शिक्षण घेतलेल्यांची समाजाप्रति असणारी जबाबदारी यांसारख्या अनेक महत्त्वाच्या विषयांची मांडणी यशवंतराव एखाद्या कसलेल्या शिक्षणतज्ज्ञाप्रमाणे करतात. विशेष म्हणजे ही मांडणी करताना स्नातक अर्थात नव-पदवीधरांविषयी म्हणजेच देशाच्या तरुण उच्चशिक्षित पिढीविषयी त्यांना वाटणारं प्रेम आणि आशावाद त्यांच्या शब्दाशब्दांतून व्यक्त होताना दिसतो.
महत्त्वपूर्ण राजकीय घटना-घडामोडींनी, निर्णयांनी आणि व्यक्तित्वांनी १९७० चे दशक व्यापून टाकले होते. या सर्वांचा या पुस्तकात एका अंतस्थाने अतिशय तारतम्याने आढावा घेतला आहे. तसेच भारतातील लोकशाहीचे वस्तुनिष्ठ मूल्यमापन केले आहे. आणीबाणी लागू करतानाची परिस्थिती, उच्च पातळीवरील निर्णयप्रक्रिया, पडद्यामागील गुप्त हालचाली, संजय गांधी व चौकडीच्या कारवाया आणि इंदिरा गांधींची याबाबतची भूमिका, जयप्रकाश नारायण यांच्याशी गोपनीय वाटाघाटी, तसेच या दशकातील बांगला देशाची निर्मिती, सिमला करार, सिक्कीमचे विलिनीकरण इ. अभूतपूर्व घटनांमागील तपशील रंजक तितकाच उद्बोधक! पुस्तकाचे लेखक पी.एन.धर हे इंदिराजींचे सल्लागार व यावेळचे पंतप्रधान कार्यालयाचे प्रमुख होते. इतिहासाच्या पानात दडलेले सत्य सांगणारे, इंदिराजींच्या राजकीय जीवनाचे बरे-वाईट पैलू उलगडणारे आणि आतापर्यंत अज्ञात असलेली माहिती उघड करत परिस्थितीचा सर्वंकश परामर्श घेणारे महत्त्वपूर्ण पुस्तक.
ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज…
डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी…
हे दृश्य होतं बिहारमधल्या मोतिहारी जिल्हा रुग्णालयातलं आणि दृश्य बघत होती यात बदल घडवू पाहणारी प्रसूतिशास्त्रतज्ज्ञ डॉ. तरु जिंदल !
भ्रष्ट व्यवस्था, निष्क्रिय डॉक्टर्स, कुपोषणासारख्या समस्या अशा अनेक आघाड्यांवर लढत देऊन अविश्वसनीय बदल घडवून आणणाऱ्या एका तरुण डॉक्टरची प्रेरणादायी संघर्षकथा… हां, ये मुमकिन है ।
लंडनमध्ये व्यापार -उद्योग वाढले. ऐश्वर्याला गगन ठेंगणं झालं आणि त्याबरोबर गुन्हेगारीही फोफावली. खून, मारामार्या, रोगराई, दारिद्र्य सर्व काही एकत्र नांदू लागलं. बघता बघता लंडन बकाल होत गेलं. मात्र नंतर दूरदृष्टीच्या व्यक्तींनी व संस्थांनी याच लंडनचा कायापालट केला आणि ते बनलं एक सर्वांगसुंदर महानगर…
पहिलं ‘जागतिक महानगर’!
मानवी सर्जनशीलता, बुध्दी, वैज्ञानिक दृष्टिकोन आणि तंत्रज्ञान म्हणजेच आजचं लंडन. लंडनचा हा प्रवास थोडाथोडका नव्हे, तर २००० वर्षांचा आहे. या पहिल्या ‘ग्लोबल सिटी’ च्या जडणघडणीची, चढ-उतारांची सुरस कथा म्हणजेच…
‘लंडननामा!’