‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ कथासंग्रहातल्या संपादकाच्या मनोगतातील निवडक भाग
गेल्या अनेक वर्षांमध्ये जगभरात छोटी-मोठी युद्धं, अतिरेकी हल्ले, खून-मारामाऱ्या, आर्थिक मंद्या, चित्र-विचित्र प्रकारचे अनेक आजार, कुपोषण, भूकंप, महापूर…. अशा, रोजचं आयुष्य हादरवून टाकणाऱ्या अनेक घटना घडतच होत्या…तरी त्यातून मार्ग काढत आपण उद्याचा दिवस उगवण्याची वाट पाहत होतो आणि पुढे जात होतो. पण या वर्षाच्या सुरुवातीपासून जगभरात अचानक अशा काही घटना घडू लागल्या आणि आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात एक मोठ्ठी उलथापालथ झाली…‘करोना’चा इवलासा व्हायरस वाट मिळेल तिथून आपल्या आयुष्यात, शरीरात घुसू लागला. ज्या आजारावर काही इलाजच माहीत नाही त्याच्याशी लढावं कसं? या प्रश्नासकट अंधारातली लढाई सुरू झाली. मोठमोठ्या राष्ट्रांसह गरिबातले गरीब देश भरडून निघाले. सुखवस्तू, सधन वर्ग आपापल्या गुबगुबीत घरात लॅपटॉपसमोर बसून कामाचे तास भरत पहिल्यांदाच मिळालेल्या इतक्या साऱ्या वेळेचा सदुपयोग कसा करावा या विवंचनेत होता; तर गरीब, हातावर पोट असणारा वर्ग सरकारच्या मदतीकडे, लॉकडाउन कधी संपतो याकडे डोळे लावून बसला होता.
या सगळ्याच धामधुमीत खरंतर रोजचं आयुष्य कुठेतरी थांबून गेलंय असं वाटू लागलं. नैराश्याचे लोटच्या लोट भोवतालच्या हवेत जाणवत होते. मित्र-मैत्रिणीसोबत सुस्कारे टाकूनच्या गप्पा तर चालूच होत्या. बारामती भागात ऊसतोडणी कामगारांच्या मुलांसाठी काम करणारे परेश, त्याची पत्नी समु, संतोष शेंडकर या मित्रांच्या संपर्कात होते. ‘करोना’मुळे बिकट परिस्थिती ओढवलेल्या अनेक मजुरांसाठी, कामगारांसाठी त्यांची टीम मदत गोळा करून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम धडाडीने करत होती. एकदा बोलत असताना परेश म्हणाला, “या सर्व अनुभवांमध्ये खूप वेगवेगळे चेहरे दिसत राहतात मजुरांचे. पण, माझ्या गावाकडची, नेरच्या दिशेने पायपीट करत जाणारी ‘ती’ सारखी हाक घालते. तिची गावाकडे जायची ओढ, घराकडे लागलेले डोळे जाम अस्वस्थ करतात. तिची गोष्ट लिहावी वाटते जेणेकरून तिच्यासारखे असंख्य स्थलांतरित लोक आज काय अनुभवताहेत हे तुझ्यासारख्या शहरी लोकांना समजेल.” बोलता बोलता पुस्तक डोळ्यांसमोर आकार घेऊ लागलं. याच धर्तीवर अजून काही कथा घेतल्या तर? करोनाच्या या बंद बंद दिवसांमध्ये माणसाला जिवंत ठेवणारा असा कोणता धागा असू शकतो? प्रेम, माया, ओढ, मैत्री?…. ज्याला हा वायरस काहीच ताप देऊ शकत नाही. हा धागाच बिना मास्क, बिना सॅनिटायझर तुमच्या आत ऑक्सिजन बनून राहतो. हे प्रेम मग ते कोणत्याही नात्यातलं, जाणिवेतलं असू शकतं… लव्ह इन द टाइम ऑफ करोना !! बेस्ट, शीर्षकसुद्धा क्लिक झालं.
मग काय, ‘टीम रोहन’ला ही कल्पना ऐकवली. मार्क्वेझच्या ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ या क्लासिक इतकीच ती सुपरहिट होईल याची सर्वांना खात्री वाटली. हळूहळू लेखकांच्या नावाचा शोध, त्यांच्याशी गप्पा-चर्चा, शब्दसंख्येची घासाघीस, ‘प्लीज कथा वेळेत द्या’च्या आणाभाका…. सगळीच लगीनघाई जोरात सुरू झाली. आम्ही ज्या ज्या लेखकांशी बोललो त्या सर्वांनीच कल्पना उचलून धरली. त्यांच्या बोलण्यातून असं जाणवलं – कदाचित त्यांनाही यावर लिहून मोकळं व्हायचं होतं. खरंतर अजून खूप लेखक डोक्यात होते, पण वेळेची मर्यादा आणि पानसंख्येचं गणित यांमुळे आम्ही जास्त पुढे गेलो नाही.
दिलेल्या मुदतीत धडाधड कथा यायला लागल्या. पहिल्यांदाच असं घडलं असेल की, लेखकांच्या विशेष मागे न लागताच कथा येऊन हजर!! अपेक्षा केल्याप्रमाणे सर्व कथांचे बाज, शैली अतिशय रंगबेरंगी निघाली. कथा मेलवर दिसली की आम्ही ‘टीम रोहन’ मंडळी अक्षरश: उतावीळासारखी वाचून घेत असू आणि कधी एकदा फोनवर त्याविषयी बोलतो, असं आम्हा सगळ्यांना होत असे. प्रदीपसर सर्व लेखकांसोबत संपर्कात होते. खास त्यांच्या शैलीतून संवाद साधत, कधी कथेतले बदल तर कधी कथेतल्या आवडलेल्या जागांना उत्स्फूर्त प्रतिसाद देत, कथा वेळेत येण्याच्या मोहिमेत मुख्य शिलेदाराचं काम चोख बजावत होते. ‘या वेळेस नाही जमणार सर कथा’ असं वारंवार म्हटल्यानंतर हृषीकेश पाळंदेचा सरांना मेसेज – ‘सर, अभिनंदन! मी कोवीड पॉझिटिव्ह झालो अखेर’ त्या अभिनंदनातून आम्हाला काय समजायचं ते समजलंच!! हुरहुर वाटली ती फक्त हृषीकेश गुप्तेच्या कथेची. त्याची कथा या संग्रहात असावीच असं वाटत होतं; पण काही कारणांनी तो कथा देऊ शकला नाही.
नीरजा, मनस्विनी, गणेश मतकरी यांसारखे आजचे लिहिते आणि लोकप्रिय लेखक या निमित्ताने रोहनशी जोडले गेले. श्रीकांत बोजेवार, प्रवीण धोपट, प्रणव सखदेव, हृषीकेश पाळंदे, परेश ज.म. यांसारखे आमचे हक्काचे लेखक एका विनंतीवर कथा द्यायला तयार झाले. या प्रत्येकाच्या कथेत ‘लव्ह’ हा अँगल किती भन्नाट आणि अर्थपूर्ण आलाय हे तुम्ही प्रत्यक्ष कथा वाचाल तेव्हा जाणवेलच. ओढूनताणून ‘करोना’ची पार्श्वभूमी आणून त्यात प्रेमाचा खून कुणीही नशिबाने केला नाही, त्यामुळे या सगळ्याच कथा खोलवर स्पर्शून जातात.
इतर सर्व पुस्तकांप्रमाणे हे पुस्तकही उत्तम टीमवर्कचं फलित आहे. माझ्यासोबत नीता आणि प्रणवनी काही कथांचं संपादन केलं आहे. प्राचीनी तिचा नेहमीचा आर्टिस्टीक टच पुस्तकाला दिला आहे. मुग्धा दांडेकर आणि प्रभा वझे यांनीही आपापल्या भूमिका चोख बजावल्या आहेत. रोहनच्या छायाचित्रांचा वापर करून राजू देशपांडेंनी पुस्तकाचं दिलखेच मुखपृष्ठ तयार केलं आहे.
‘करोना’च्या या अवघड काळात मानसिक स्वास्थ्यासाठी, उत्तम आरोग्यासाठी, प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी भरभरून पुस्तकं येताहेत. ‘काळजी घ्या’, ‘घरात राहा’ सांगणारे अनेक व्हॉट्सअॅप मेसेजेस मेंदूचा ताबा घेताहेत. पण मनात चाललेला कोलाहल घालवून मनाला निववण्यासाठीपण काहीतरी हवं की नाही? म्हणूनच तुमच्या-आमच्या मनात शाश्वत असणाऱ्या ‘प्रेम’ या संकल्पनेवर आधारित या खास ८ कथा फक्त तुमच्यासाठी! प्रेमाचा विषय निघालाय आणि कबीराची आठवण नाही असं कसं? तर मनोगताचा समारोप कबीराच्या या दोह्याने –
पोथी पढ पढ जग मुआ, पंडित भया न कोय ।
ढाई अक्षर प्रेम का, पढे सो पंडित होय ।
-अनुजा जगताप
- लव्ह इन द टाइम ऑफ करोना
- ८ लिहिते लेखक… : नीरजा, श्रीकांत बोजेवार, गणेश मतकरी, प्रवीण धोपट, प्रणव सखदेव,
मनस्विनी लता रवींद्र, परेश जयश्री मनोहर, हृषीकेश पाळंदे
पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल ऑक्टोबर २०२०
रोहन शिफारस
लव्ह इन द टाइम ऑफ करोना
कथा प्रेमाच्या… कथा ओढीच्या
एका अदृश्य व्हायरसने अख्ख्या जगाचा कब्जा घेतला. सगळंच एकदम स्टॅच्यू होऊन गेलं… Standstill! या अस्वस्थ वर्तमानामध्ये चहूकडे मरणाची दाट छाया पसरलेली असताना मनं कासावीस झाली. प्रेमाचा अंकुर मात्र सोशल डिस्टन्सिंगचा मुलाहिजा न पाळता बेभान पसरत गेला. सगळं जितकं जास्त बंद बंद होत गेलं तितकं कुणीतरी जास्त जवळचं असावं असं वाटू लागलं. या करोनाकाळात वेगवेगळ्या नात्यांमध्ये फुलणारं प्रेम हेच आता नव्याने जगण्याची उमेद देईल?
₹250.00Add to cart
‘संपादक उवाच’ या लेखमालेतील अनुजा जगताप यांचा लेख
मला ‘जिवंत’ ठेवणारी वास्तवातली पुस्तकं
‘समाजरंग’ची पुस्तकं करताना काही विशेष बाबी लक्षात घ्याव्या लागतात. मराठी साहित्यात गेली ५० वर्षं शोषित, वंचित समूहांचं दर्जेदार आणि संघर्ष उलगडून दाखवणारं लिखाण प्रकाशित झालं आहे. हे सर्व साहित्य वाचताना या समूहांच्या सामाजिक पार्श्वभूमीचं भान असणं, त्यांच्या समस्या जाणून घेण्याची आस आणि समज असणं मला महत्त्वाचं वाटतं. त्याचबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करत असणारे वेगवेगळे गट आणि प्रवाह, त्यांच्यातलं राजकारण हे अगदी खोलवर नाही, पण काठाकाठाने माहीत असणं गरजेचं वाटतं.
लक्षणीय कथा-कादंबऱ्या
घनगर्द
हृषीकेश गुप्ते
हृषीकेशच्या सगळ्या कथांमधून आरपार जाणारं एक सूत्र आहे.
ते म्हणजे त्यात दिसणारी कल्पनाशिलता.
त्याच्या प्रत्येक कथेच्या केंद्रस्थानी
मुठीतल्या काजव्यासारखी लुकलुकणारी एखादी कल्पना असते.
हृषीकेश त्या कल्पनेच्या सगळ्या शक्यतांचा शोध घेत जातो.
तिचे सगळे कोपरे धुंडाळतो.
महत्वाचं म्हणजे, तो या प्रक्रियेचा आनंद घेतो.
म्हणूनच त्याच्या कथांमध्ये
एक चैतन्य सळसळताना जाणवतं.
‘घनगर्द’ या कथांसंग्रहामधून
हृषीकेशच्या कथेने एक उंबरठा ओलांडला आहे.
ती आता अधिक व्यामिश्र आणि पैलूदार होते आहे
भय आणि अदभूताचा मार्ग तिने सोडलेला नाही.
मात्र त्या मार्गाला आता अनेक नव्या वाटा फुटलेल्या आहेत.
त्या नेमक्या कुठे जाणार हे कोणीही सांगू शकणार नाही.
पण हा प्रवास दीर्घ आणि रोमहर्षक असेल.
याची खात्री ‘घनगर्द’ वाचल्यावर पटते, हे महत्वाचं.
– निखिलेश चित्रे (प्रस्तावनेतून)
झुरांगलिंग
हृषीकेश पाळंदे
टडंगऽऽऽ टडंगऽऽऽ
मी आहे एक लेखकदेव…
एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले…अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी… अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची… झुरांगलिंग !
नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य
प्रणव सखदेव
खूप वर्षांनी भेटलेले मित्रं सोशल मीडियामुळे ‘कनेक्टेड’ असले, तरी प्रत्यक्षात मात्र बरेच बदललेले असतात. हा ताण त्यांच्या मैत्रीची ‘छत्री’ कशीबशी पेलत राहते…
आर्थिक मंदी, ‘आयटी’तले लेऑफ यांमुळे कोलमडू लागलेलं एका जोडप्याचं आयुष्य एक साधा ‘भाजीवाला’ सावरू पाहतो, अन् अचानक गायब होऊन जातो…
आचकट बोलणार्या ‘ट’च्या मनात कितीतरी वर्षं एक जखम ठसठसत असते, आणि ती जेव्हा उघडी पडते तेव्हा एक ‘टची गोष्ट’ समोर येते…
आधुनिक जगण्याच्या रेट्यात आर्यन-संजिताची मनं एकमेकांपासून एवढी दुरावत जातात, की संबंधांचं ‘अॅबॉर्शन’ होणार आहे हे त्यांना समजत नाही…
एका साध्याशा पोस्टमुळे सुरू झालेल्या चर्चेतून जेव्हा ‘अभ्र्यांमागे दडलेल्या फँड्री’चा भेसूर चेहरा समोर येतो तेव्हा सुन्न व्हायला होतं…
आपण कुठून आलो, या प्रश्नाचा शोध घेत जेव्हा एक गर्भ भूत-वर्तमान-भविष्य अशा तिन्ही काळात संचार करू लागतो, तेव्हा ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाच्या रहस्या’चा गुंतागुंतीचा गोफ विणला जातो…
जगण्यातल्या ताणांचा, पेचांचा-गुंत्यांचा आणि प्रश्नांचा सखोल वेध घेणार्या, वास्तव-कल्पित व मिथककथा यांच्या बांधणीतून तयार झालेल्या ‘आजच्या काळाच्या’ आठ कथांचा संग्रह!
ढग
विश्राम गुप्ते त्रिधारेतील तिसरं पुस्तक
विश्राम गुप्ते
‘ढग’ ही ‘चेटूक’ आणि ‘ऊन’नंतर त्रिधारेतील शेवटची कादंबरी.
‘चेटूक’मधून सामाजिक, ‘ऊन’मधून कौटुंबिक आणि ‘ढग’मधून व्यक्तिगत… अशा आत्मशोधक जाणिवांचा प्रवास हे ह्या त्रिधारेचं वैशिष्ट्य आहे.
‘मी कोण ?’ हा ‘ढग’चा काळीजप्रश्न आहे. ह्या प्रश्नाचे निनाद काही माणसांच्या मनात कायम गुंजत असतात. पण जगण्याच्या झटापटीत त्याकडे दुर्लक्ष होतं.
ढग ह्याच आद्य प्रश्नाशी झुंज देते. ती घेताना आठवणीचा पासवर्ड वापरून ती भूतकाळाच्या गुहेचं दार उघडते.