MN_April19

Reading Time: 8 Minutes (795 words)

२३ एप्रिल रोजी असलेल्या ‘जागतिक पुस्तक दिना’निमित्त ‘माझी निवड’ स्तंभात बहुविध वाचन करणारे सोलापूरस्थित वाचक व लेखक नीतीन वैद्य यांनी लेखन केलं आहे. वैद्य सातत्याने मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतल्या ललित तसंच ललितेतर ग्रंथांचं वाचन करत असतात.

गुणवत्ता यादी बंद झाली, प्रश्नपत्रिका वाचायला अधिकचा वेळ मिळू लागला, तोंडी परीक्षा आणि कलाक्रीडाकौशल्यांच्या कागदी चवडींमधून अतिरिक्त गुणांची खैरात होऊ लागली, हे एवढं सारं होऊनही गळेकापू स्पर्धेने ९० टक्क्यांवर गुण मिळवणाऱ्यांनाही सैरभैर केलं आहे… या संदर्भात समुपदेशन करणाऱ्यांचे फोन या काळात सकाळी सातपासून वाजू लागतात…

‘कॉपी पकडण्यासाठी नेमलेल्या भरारी पथकाचे सदस्य आहोत’ अशी बतावणी करत दोन डमी विद्यार्थ्यांनीच परीक्षाकेंद्रात थेट आत प्रवेश मिळवला…
राजकीय घटितांनी सर्वच माध्यमांचे अवकाश भरून गेलेले असतानाही लक्षात राहिलेल्या या अलीकडच्या बातम्या… परीक्षांच्या काळात दरवर्षी अशा बातम्या वाचताना मला रमेश इंगळे उत्रादकर यांची ‘सर्व प्रश्न अनिवार्य’ ही कादंबरी आठवते. मराठवाड्यात चौथी-सातवी स्कॉलरशीप, दहावी-बारावी बोर्ड परीक्षांतल्या सामुहिक कॉप्यांची चर्चा दशक-भरापूर्वी सर्वोच्च टीआरपी मिळवून होती. त्या काळातली, पण त्यापलीकडे काही आवाहन करू पाहणारी ही कथा. शासनाच्या त्याआधीच्या सर्वशिक्षण अभियानाच्या अंमलबजावणीतला फार्स गांभीर्याने तरी, धारदार उपरोधाच्या विनोदी सुरात मांडणारी ‘निशाणी डावा अंगठा’ ही उत्रादकर यांची पहिली कादंबरी त्यावर निघालेल्या सिनेमामुळे आपल्याला माहीत आहे, त्याचाच पुढचा टप्पा असावा अशी ही कादंबरी.

एका बाजूला गळेकापू स्पर्धेच्या दबावाने साधनशुचितेचा विवेक गमावलेले विद्यार्थी व पालक आणि दुसऱ्या बाजूला शाळा आणि क्लासचे दुकान चालू राहावं यासाठी शिक्षकांना दावणीला बांधण्यापासून कुठल्याही थराला जाणारे संस्थाचालक यांच्या अभद्र युतीतून तयार झालेला कॉपीचा व्हायरस संपूर्ण समाजालाच कसा पोखरून काढतो याचं भेदक तपशीलवार चित्रण करणारी ही कादंबरी शेवटी काही आशावादी सूर लावते, तरी अखेरीस तुमच्या-आमच्या नैतिक भूस्खलनाची कहाणी होते.

महात्मा गांधी, साने गुरुजी आदींचे संस्कार अजून शिल्लक असलेल्या सपकाळ सरांच्या व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची ही कथा. अचानक काही वर्षांत चौथी-सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत ३०० पैकी ३०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या शेकड्यांच्या घरात जाते. दहावी-बारावीचे, कसल्याच किमान सोई नसलेल्या शाळांचे निकाल अचंबित करण्याएवढे लागायला लागतात, तसे सपकाळ गुरुजी अस्वस्थ होतात. व्यवस्थेचाच भाग असल्याने या सगळ्यामागे असणाऱ्या कॉपी प्रकरणाची व्याप्ती खणून काढणं, ही त्यांना आपल्या अस्तित्वाचीच लढाई वाटते. शाळेत नवीनच लागलेला त्यांचा सहकारी शेषराव यात गुरुजींबरोबर आहे. कालातीत मूल्यांवर विश्वास असल्याने सपकाळ गुरुजींवर त्याची श्रद्धा असली तरी, बदलत्या काळातल्या व्यावहारिकतेचं त्याला भान आहे. त्यामुळे काहीसं लवचिक होण्यातली अपरिहार्यता त्याला माहीत आहे. आपली भूमिका न सोडणाऱ्या गुरुजींची त्याला काळजी वाटते. पण गुरुजींनी लढा अंगावर घेतल्यावर शेषराव त्यात सामील होतो. मग, वेगवेगळ्या केंद्रांवर होणाऱ्या कॉप्यांसाठीची शोधयात्रा सुरू होते. कॉप्यांचे वेगवेगळे प्रकार आपण दंतकथेसारखे ऐकतो, वृत्तपत्रांतून वाचतो, शाळांच्या भिंतींवर खिडकाबाहेरून पोपटांसारख्या लगडलेल्या कॉप्या पुरवणाऱ्यांचे फोटो आपण पाहतो, क्वचितच अनुभवतोही. पण इथले त्याचे विश्वरूपदर्शन एखाद्याने पीएचडीचा प्रबंध लिहावा इतके संदर्भसमृद्ध तपशिलांनी होते. हा महाराष्ट्रातला या प्रश्नासंबंधीचा ऐतिहासिक दस्ताऐवज ठरावा. (अर्थात तपशिलांच्या, किश्शांच्या मागे काहीसे वाहवत जाताना कादंबरीचा कथात्म-बाज कोसळतो हा भाग अलाहिदा. बऱ्याचदा अनुभवात आलेले, वा नसल्यास गरज म्हणून गोळा केलेले तपशील वा किस्से इतके रोचक असतात की, ते सगळे सांगून टाकण्याचा मोहही आवरत नसावा. असो.) शेवटी हाती लागतं ते मती गुंग करणारं आहे. गुणवत्तेचा एकमेव निकष परीक्षेतील मार्क्स ठरवल्यावर आणि त्या मार्कांचा प्रत्यक्षातील गुणवत्तेशी संबंध तपासणारी कसलीच यंत्रणा अस्तित्वात नसल्यावर हे असं होणं अपरिहार्य आहे, ही जाणीव हतबल करणारी आणि शोकात्म आहे.

सपकाळ सर शेवटी एकाकी, एकटे होतात. त्यांना वाटतं; आपली वाट घनदाट अरण्याची, घनघोर युद्धाची, निबीड काळोखाची, खडतर खस्तांची आहे. नीरव, निर्मनुष्य… आज तर किमान नैतिक टोचणी देणारे सगळेच प्रश्न ऑप्शनला टाकण्याच्या काळात सपकाळ सरांसारख्या सगळ्यांचंच एकटेपण अधिक गहिरे झालेय..

…दिवस बदलले, दहावी विशेषत: बारावीच्या मार्कांचं महत्त्व तिथून पुढच्या प्रत्येक मार्गासाठी स्वतंत्र प्रवेशपरीक्षा होत असल्याने त्याला पात्र ठरण्या-इतपतच राहिलंय. त्याहीआधी काही वर्षं गुणवत्ता यादीही रद्द झाल्याने त्याला असणारे तथाकथित ग्लॅमरही संपलं. नांदेड वगैरे ठिकाणच्या निकालांचाही फार ब्रभा झाल्याने भरारी पथकं वगैरे नेमून निकाल जमिनीवर आणले गेले. दुसऱ्या बाजूला शाळेकडून काही मार्क्स देण्याचा, वेगवेगळ्या कला, क्रीडा, एनसीसी वगैरे क्षेत्रांसाठी वाढीव गुण देण्याचा ‘मक्ता’ शाळांकडेच देण्यात आला. त्यातून किमान माक्र्सचा, पास होण्याचा प्रयत्न सुटलाय, पण म्हणून मूळ प्रश्न सुटलाय का? स्पर्धा अधिकाधिक गळेकापू होत चालली आहे. ‘एन्ट्रन्स एक्झाम’मधून थेट मेडिकल वगैरे ठिकाणी प्रवेशाचे ठेके घेतले जाताहेत, खेळ नव्या रूपात, हलक्या आवाजात पण अधिक व्यापक स्वरूपात सुरूच आहे… सपकाळ सरांचीच नव्हे, तर शेषरावसारख्यांचीही जात मात्र झपाट्याने नामशेष होत चालली आहे. यासाठी नव्हे की, तशी काही संवेदना जिवंत असणारी माणसं उरली नाहीत. यासाठी की, उर्वरितांना त्यांची गरजच वाटत नाहीये… अर्थात तपशील बदलले तरी प्रश्न तिथंच आहेत, अधिक भीषण झालेत. ही गोष्टही तपशिलांची नव्हेच, ती तुमच्या-आमच्यातल्या मरू घातलेल्या मूल्यव्यवस्थेची आहे.

– नीतीन वैद्य

सर्व प्रश्न अनिवार्य / लेखक- रमेश इंगळे उत्रादकर / शब्द पब्लिकेशन

  • मला आवडलेली इतर काही पुस्तकं
    • बखर अंतकाळाची / लेखक- नंदा खरे / मनोविकास प्रकाशन.
    • सुंभ आणि पीळ / लेखक- ल.सि.जाधव / साकेत प्रकाशन.
    • रत्नांचं झाड / लेखक- पद्मजा फाटक / रोहन प्रकाशन.
    • माझा धनगरवाडा / लेखक- धनंजय धुरगुडे / रोहन प्रकाशन.
    • गावनवरी / लेखक- वेदिका कुमारस्वामी / पॉप्युलर प्रकाशन.
    • काळेकरडे स्ट्रोक्स / लेखक- प्रणव सखदेव / रोहन प्रकाशन.
    • भरून आलेले आभाळ / लेखक- द.भा.धामणस्कर / मौज प्रकाशन.
    • सेपियन्स / मूळ लेखक- युवाल हरारी / अनु : वासंती फडके / डायमंड पब्लिकेशन्स.

पूर्वप्रकाशित : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०१९


काही लक्षणीय कादंबऱ्या

द ग्रेप्स ऑफ रॉथ

विस्थापित-स्थलांतरितांच्या जीवनावरील जगप्रसिद्ध कादंबरी


जॉन स्टाइनबेक यांचा जन्म २७ फेब्रुवारी १९०२ रोजी कॅलिफोर्नियातील सलिनास इथे झाला. कॅलिफोर्नियाच्या खोऱ्यातील सुपीक भागात वसलेलं सलिनास हे टुमदार छोटेखानी शहर पॅसिफिक समुद्राच्या किनाऱ्यापासून सुमारे अवघं २५ मैल दूर असून पुढील काळात स्टाइनबेक यांनी सर्जनशील लेखन सुरू केलं. त्यांच्या अनेक कादंबऱ्यांना सलिनास आणि पॅसिफिकचा किनारा दोहोंची पार्श्वभूमी असल्याचं आढळून येतं. १९१९मध्ये स्टाइनबेक यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश घेतला. मात्र, जरी त्यांनी तिथे साहित्य आणि लेखनासंदर्भातील अभ्यासक्रम पार पाडण्यासाठी अधूनमधून प्रवेश घेतला, तरी १९२५मध्ये कोणतीही पदवी घेतल्याविनाच ते विद्यापीठातून बाहेर पडले. पुढील पाच वर्षं न्यू यॉर्कमध्ये पत्रकारिता व मोलमजुरी करून त्यांनी आपला चरितार्थ साधला. स्टाइनबेक यांनी आपल्या साहित्यिक कारकीर्दीत अविरत प्रयोग केले आणि वेगवेगळे मार्ग चोखाळून पाहिले. १९३०च्या दशकात त्यांनी कॅलिफोर्नियातील मजूरवर्गाचं जीवन टिपणाऱ्या पुढील तीन सशक्त कादंबऱ्या - ‘इन ड्युबिअस बॅटल' (१९३६), ‘ऑफ माइस अँड मेन' (१९३७) आणि त्यांची सर्वोत्तम अशी समजली जाणारी कादंबरी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ' (१९३९) यांची निर्मिती केली. त्यानंतरही त्यांनी आपलं लेखन अविरत सुरू ठेवलं. त्यांच्या आयुष्याचं अखेरचं दशक त्यांनी आपल्या तिसऱ्या पत्नीसह न्यूयॉर्क शहर आणि सेग हार्बर इथे व्यतीत केलं. तिच्यासोबत त्यांनी विविध ठिकाणी बराच प्रवास केला. १९६२मध्ये जॉन स्टाइनबेक यांना ‘नोबेल पुरस्कारा'ने गौरवलं गेलं. २० डिसेंबर १९६८ रोजी या थोर साहित्यिकाचं निधन झालं.

अनुवाद:
गंभीर वृत्तीचे अनुवादक, संपादक व लेखक म्हणून मिलिंद चंपानेरकर विख्यात आहेत. त्यांनी आजवर ‘लोककवी साहीर लुधियानवी' (मूळ लेखक : अक्षय मनवानी), ‘त्या दहा वर्षांतील गुरू दत्त' (मूळ लेखक - सत्य सरन), ‘सुन मेरे बंधू रे - एस.डी. बर्मन यांचं जीवनसंगीत' (मूळ लेखक - सत्या सरन), ‘वहिदा रेहमान... हितगुजातून उलगडलेली', (मूळ लेखक- नसरीन मुन्नी कबीर), ‘ए.आर. रहमान : संगीतातील वादळ' (मूळ लेखक - कामिनी मथाई), ‘भारतातील डाव्या चळवळीचा मागोवा’ (मूळ लेखक - प्रफुल्ल बिडवई), ‘गुड मुस्लीम बॅड मुस्लीम' (मूळ लेखक - महमूद ममदानी, सह-अनुवादक - पुष्पा भावे) यांसारख्या महत्त्वाच्या पुस्तकांचा अनुवाद केला असून ‘यांनी घडवलं सहस्रक' आणि ‘असा घडला भारत' या महद्ग्रंथांसाठी सह-संपादन, संशोधन व लेखन केलं आहे. त्यांनी दैनिक ‘इंडियन एक्स्प्रेस'साठी १९९१-२००० या कालावधीमध्ये पत्रकारिता केली आहे. गेली तीन दशकं त्यांनी विविध मराठी दैनिक आणि नियतकालिकांमधून समाजाभिमुख साहित्य, नाट्य व चित्रपटविषयक समीक्षापर लेखन आणि त्याचप्रमाणे, सामाजिक-राजकीय विषयांवर विश्लेषणात्मक लेखन केलं आहे. त्यांना ‘लोकशाहीवादी अम्मीस...दीर्घपत्र' या अनुवादित पुस्तकासाठी सर्वोत्कृष्ट अनुवादाचा २०१६ सालचा ‘साहित्य अकादमी' पुरस्कार प्राप्त झाला आहे.

लोकाभिमुख अमेरिकन लेखक म्हणून नावाजलेल्या नोबेल पुरस्कारप्राप्त जॉन स्टाइनबेक यांच्या ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’ या १९३९ मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या दीर्घ कादंबरीने अमेरिकेतील विस्थापित-स्थलांतरितांच्या समस्येला वाचा फोडली आणि समाज ढवळून निघाला. या वास्तववादी कादंबरीद्वारे त्यांनी या समस्येच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक पैलूंवर मोठ्या सर्जनशीलतेने आणि मानवी दृष्टिकोनातून भाष्य केलं. ही कादंबरी १९३०च्या दशकातील घडामोडींच्या पार्श्वभूमीवरील असली, तरी भारतातील विस्थापितांच्या समस्यांबाबत आजही विचारप्रवृत्त करू शकेल अशी आहे.

भांडवलकेंद्री मोठ्या शेतीच्या धोरणाच्या पुरस्कारार्थ मध्य अमेरिकेतील लाखो लहान-मध्यम शेतकऱ्यांना त्यांच्या जमिनींवरुन हुसकावून लावलं गेलं… पश्चिम अमेरिकेतील कॅलिफोर्नियामधील कापसाच्या, द्राक्ष-संत्र्याच्या बगिच्यांमध्ये काम मिळेल, या आशेने या विस्थापित कुटुंबांनी दोन हजार मैलांचा खडतर प्रवास करून केलेलं स्थलांतर… त्या प्रक्रियेत वाट्याला आलेलं दैन्य, निर्वासित छावण्यांमधील भीषण अमानवी जीवन आणि उद्धवस्थता…
आणि याच प्रक्रियेदरम्यान त्यांच्या जाणिवेत घडून आलेले सूक्ष्म बदल आणि आत्मिक क्षोभाची भावना…
एक विशाल बहुपेडी पट उलगडून दर्शविणारी ही एक हृदयस्पर्शी कादंबरी.

सर्जनशील रचना आणि आगळी संवादशैली या प्रमुख वैशिष्टयांनिशी साहित्य क्षेत्रात नवे मापदंड निर्माण करणाऱ्या या कादंबरीचा ‘साहित्य अकादमी’ पुरस्कारप्राप्त मिलिंद चंपानेरकर यांनी साधलेला हा तितकाच प्रयोगशील असा मराठी अनुवाद.

लोकांच्या समस्या लोकांसाठी लोकभाषेत व्यक्त करणारी ‘द ग्रेप्स ऑफ रॉथ’.


700.00 Add to cart

96 मेट्रोमॉल


मराठीतल्या आघाडीच्या तरुण लेखकांमध्ये प्रणव सखदेव यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी अग्रगण्य मराठी दैनिकांत पत्रकार म्हणून काम केलं असून ते मराठी प्रकाशन क्षेत्रामध्ये संपादक व अनुवादक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या कथा आणि कविता मान्यवर नियतकालिकांमधून प्रकाशित होत असतात. ‘पायऱ्यांचा गेम आणि इतर कविता’ हा कवितासंग्रह, 'निळ्या दाताची दंतकथा’, ‘नाभितून उगवलेल्या वृक्षाचं रहस्य' हे कथासंग्रह, व ‘काळेकरडे स्ट्रोक्स', ‘96 मेट्रोमॉल’ या कादंबऱ्या असं त्यांचं साहित्य प्रकाशित झालं आहे. त्यांना अनुवाद-प्रकल्पासाठी २०१५-१६ सालची ‘कुसुमाग्रज प्रतिष्ठान’ची अभ्यासवृत्तीही मिळाली आहे. त्यांना लेखनासाठी महत्त्वाची पारितोषिकं मिळाली असून इंग्रजीतल्या गाजलेल्या पुस्तकांचा अनुवाद त्यांनी केला आहे. फिक्शन लेखन करणं ही त्यांची पॅशन असून त्यातून समकालातल्या प्रश्नांचा भिडणं हे त्यांना महत्त्वाचं वाटतं. आजच्या तरुणांची मानसिकता, त्यांचे प्रश्न, विखंडित जगणं व तंत्रज्ञानाचा वाढता वापर या सगळ्याचं प्रतिबिंब त्यांच्या लेखनात पडलेलं दिसून येतं.

काळेकरडे स्ट्रोक्स’नंतरची प्रणव सखदेव यांची ही दुसरी कादंबरी. रूढार्थाने ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ वास्तववादी कादंबरी आहे तर ‘96 मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका! दोन्ही कादंबऱ्यांचे प्रोटॅगनिस्ट युवक असले, तरीही दोघांचे जीवनमार्ग पूर्णत: भिन्न आहेत, त्यांचं जग भिन्न आहे, त्यांतले घटना-प्रसंग, अनुभवविश्व भिन्न आहे. त्यामुळेच या दोन्ही कादंबऱ्या एकाच लेखकाच्या असल्या तरी त्याकडे वेगळ्या दृष्टीने पाहणं भाग आहे!

‘96 मेट्रोमॉल’मधला मयंक एका काल्पनिक जगात प्रवेश करतो; हे जग असतं वस्तूंचं – आपण रोज वापरत असलेल्या वस्तूचं ! मयंकचा या वस्तूंशी जसजसा संबंध येऊ लागतो तसतसं त्या वस्तूच मयंकला वापरू लागतात! आणि यातूनच घडत जाते आजच्या उपभोगवादी जगण्यावर अद्भुतिकेतून भाष्य करणारी लघुकादंबरी…96 मेट्रोमॉल !


This novel is a work of fantasy. It speaks about the growing consumerism, self centered and individualistic approach


170.00 Add to cart

झुरांगलिंग


हृषीकेश पाळंदे याचा जन्म १९८५ सालचा. तो पुण्यातच शिकला आणि वाढला. आर्किटेक्चरची डिग्री अर्धवट सोडून त्याने बी.एस्सी. स्टॅटिस्टिक्स केलं. त्यानंतर एम.एस्सी व डिप्लोमा इन जर्नालिझम हे दोन्ही कोर्सेसही त्याने अर्धवट सोडून दिले. त्यानंतर कुठलीच नोकरी नीट केली नाही. अर्धवट सोडणं, हे त्याचं लक्षण बनलं. 'काय करणारेस तू पुढे?' या प्रश्नाला कंटाळून कुटुंब आणि पुण्याला सोडून २०११ साली अहमदाबाद ते जम्मू असा १९०० किमीचा एकांडा सायकलप्रवास त्याने केला. या सफरीत त्याला स्वत:बद्दल आणि आयुष्याबद्दल अनेक इंटरेस्टिंग प्रश्न पडले. तो डोक्यातला गुंता त्याने 'दोन चाकं आणि मी' या प्रवासवर्णनपर पुस्तकातून लिहिला. डोक्यातल्या प्रश्नांच्या चक्राला वाहिलेल्या 'बयो' आणि 'भरकटेश्वर' या दोन कादंबऱ्याही लिहिल्या. त्यानं अजूनतरी लिखाणाला सोडलं नाहीये. सध्या तो कोकणात राहतोय. चंगळवादाची झापडं लावून बसलेल्या जगात तो मिनिमलिस्ट जीवनशैलीनी जगू बघतोय . बुद्धाने सांगितलेल्या मध्यमार्गावर सध्या तो बरंच काही वाचतोय, त्यावर उलटसुलट विचार करतोय.

टडंगऽऽऽ टडंगऽऽऽ

मी आहे एक लेखकदेव…

एकदा काय झालं, पुण्यनगरीतल्या त्याच त्या रूटीनला वैतागून मी दूर हिमालयाच्या मुख्य रांगेच्याही पलीकडच्या रम्य प्रदेशात गेलो. हा लदाखी प्रदेश रूक्ष, बोडक्या मातकट पर्वतांचा. हिवाळ्यात तयार होणाऱ्या शुभ्र हिमगालिच्यांचा, खळाळ वाहणाऱ्या नद्यांचा, दरीतल्या हिरवाईचा, डोक्यावर असणाऱ्या गर्द निळ्याभोर आभाळाचा आणि त्याखाली ध्यानस्थ बसलेल्या बुद्धाचा! तिथे मी खूप दिवस मुक्काम ठोकला. सामान्य टुरिस्ट म्हणून गेलो नसल्याने मनसोक्त भटकत असतांना मी एक गोष्ट ऐकली. मग झालं काय की, त्या गोष्टीतल्या घटनांच्या प्रवाहाचा माग काढता काढता त्यात अनेक प्रवाह मिसळत गेले. म्हणजे अनिता-लोब्झांग, झुरांग-निस्सू, मेमेले…अशा जिवंत माणसांचा, अवलोकितेश्वर-तारादेवी या देवांचा आणि लिंग केसरसारख्या आख्यायिकांचाही! या प्रवाहात मी पाहिलेलं, न पाहिलेलं, माझ्या डोक्यातलं, मनातलं..असं सगळंच वाहत वाहत आलं. थोडक्यात काय तर, या लेखकदेवानी एक गोष्टच विणून टाकली वाचकदेवासाठी… अस्तित्वातल्या आणि नास्तित्वातल्या घटनांची… झुरांगलिंग !


300.00 Add to cart

ऊन


विश्राम गुप्ते त्रिधारेतील दुसरं पुस्तक


विश्राम गुप्ते हे मराठीतले आघाडीचे कादंबरीकार, समीक्षक आणि अनुवादक म्हणून प्रसिद्ध आहेत. धर्म, स्त्री-पुरुष नातेसंबंध, मानवी मन, कुटुंबव्यवस्था हे त्यांच्या चिंतनाचे विषय असून यांबद्दल ते आपल्या कादंबरी तसंच ललितेतर लेखनातून चिकित्सा करत असतात. अभिजात साहित्याबरोबरच मराठीतल्या नव्याने लिहणाऱ्या तरुण लेखकांचं लेखन ते आस्थेने वाचतात. त्याबद्दलही ते चिकित्सक दृष्टिकोन ठेवून टीकात्मक लिहितात. त्यांच्या पुस्तकांना राज्य शासनाच्या पुरस्कारांबरोबरच इतरही महत्त्वाचे पुरस्कार मिळाले आहेत.

चेटूक’, ‘ऊन’ आणि ‘ढग’ ह्या त्रिधारेतील ‘ऊन’ ही दुसरी कादंबरी.

स्त्री-पुरुष प्रेमातला संवाद विसंवादात रुपांतरीत झाल्यानंतर दिघ्यांच्या घराला घोर लागतो. पण रोजचं जगणं कोणाला चुकलं आहे? ते सर्वव्यापी उन्हात सुरूच राहतं.

इथे भेटणारी बाया-माणसं आणि मुलं जगण्याच्या नादावर डोलत मोठी होतात. खूप काही कमावतात, खूप सारं गमावतात. राणी आणि वसंताची दोन्ही मुलं प्रकाश आणि विकास कौटुंबिक प्रेमाची ऊब कमावतात. ऊन या उबेचा लख्ख उत्सव आहे. संक्रमण काळात कौटुंबिक प्रेम हे मूल्यं टिकून राहावं ही ‘ऊन’ची आकांक्षा आहे.


300.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *