दैनिक महाराष्ट्र टाइम्समधील ‘चतुर’ या पुस्तकाचे दीपक घरे यांनी लिहिलेले परीक्षण! धन्यवाद!

प्रणव सखदेव यांची ‘चतुर’ ही तिसरी कादंबरी. आधीची ‘९६ मेट्रोमॉल’ ही अद्भुतिका होती, तर ‘चतुर’ मेटाफिक्शन म्हणता येईल. प्रणव सखदेव हे नव्या फॉर्मच्या शोधात असलेले लेखक आहेत. ‘चतुर’चा विषय साधा आहे. साहित्यामध्ये अनेक वेळा आला आहे. बालपण संपून वयात येण्याची, वास्तवाची जाणीव होण्याची ही कथा आहे. ती वेगळी होते तिच्या घाटामुळे, फॉर्ममुळे; अथवा रूढ फॉर्मच्या अभावामुळे!

कादंबरीचा नायक तरुण लेखक आहे. दुर्धर आजाराने ग्रासलेला असल्याने, मृत्युपूर्वी आपली आत्मकथा असलेली कादंबरी प्रकाशित व्हावी, अशी त्याची इच्छा आहे. दुर्दैवाने ती प्रकाशित होण्याआधीच त्याचा मृत्यू होतो. त्याची पत्नी रमा मग त्याची शेवटची इच्छा म्हणून ती प्रकाशित करण्याचा घाट घालते. मूळ संहितेला काही टिपा जोडते. काही नवे भाग लिहून जोडते. परिणामी, कादंबरी म्हणजे घटना-प्रसंग, कविता, घुसवलेल्या गोष्टी असा सगळा काला बनतो. थोडक्यात सांगायचे, तर कादंबरी किंवा एकूणच साहित्याचे रचना संकेत मोडून केलेली ही उफराटी रचना आहे. मृत्यूच्या नांदीपासून कादंबरीची सुरुवात होते आणि ‘जीवन अखंड वाहत असतं नि मरण हा जीवनाचाच एक भाग असतो, तो अंत नसतो,’ या भरतवाक्यावर संपते. मृत्यूचे सकारात्मक अस्तित्व सतत जाणवत राहणे आणि वाढत्या वयाबरोबर निरागसपणा हरवत जाणे, हे या कादंबरीचे मुख्य सूत्र आहे.

मध्यमवर्गीय आई-बाबांच्या पोटी जन्मलेला, तालुक्याचे गाव आणि महानगर यांच्या सीमारेषेवर असलेल्या कल्याणसारख्या गावात, बालपण व तरुणपण घालवलेला मुलगा. त्याची शाळा, क्रिकेट खेळणारे सवंगडी, गावाच्या भोवतालचा परिसर आणि त्याच्या मनोव्यापारांचे अद्भुत जग. घडणाऱ्या छोट्या-मोठ्या प्रसंगांमधून; तसेच मोठ्यांच्या अपेक्षा आणि अंतर्गत ऊर्मी यांच्यातील विरोधातून गोष्ट उलगडत जाते. सुख आणि सुरक्षिततेच्या भ्रामक कल्पना, जगण्यातले अंतर्विरोध स्पष्ट होतात. सुरुवातीला आईची कैफियत येते, ‘आम्ही तुझे जन्मापुरते आई-वडील झालो; पण मित्र नाही होऊ शकलो.’ त्याच्या पुढे लगेच एक जातक कथा येते. वडिलांची हत्या करणाऱ्या राजा अजातशत्रूची. अपराधभावना आई-वडिलांची आणि मुलाची. पुढे कादंबरीतल्या लेखकाचे निरीक्षण येते, ‘माणसांच्या नात्यात काही तरी मिसिंग राहतं. हे मिसिंग काय असतं, ही तशी अनाकलनीय गोष्ट असते.’ शाळेत नागरे मॅडम निबंध स्पर्धा घेतात. हुशार समजल्या जाणाऱ्या प्रणवचा निबंध चाकोरीबाहेरचा असल्यामुळे, त्याला पायाचे अंगठे धरून उभे राहण्याची शिक्षा केली जाते; कारण छापील पुस्तकांपेक्षा जीवनाचेच पुस्तक वाचत असल्याचे त्याने नमूद केलेले असते. बायॉलॉजिस्ट असलेल्या संशोधक जलराजा काकांच्या प्रभावाचा तो परिणाम असतो.

निरागस उत्सुकतेने लहानपण रसगुल्ल्यासारखे भरलेले असते. घरचे, भोवतालचे, नातेवाइक हे ओलेपण पिळून काढतात. आपण शुष्क आणि कोरडे होत जातो. अपवाद जलराजा काकांचा किंवा वर्गातल्या मल्लिकाचा, वेळोवेळी भेटणाऱ्या रमाचा. ही पात्रे म्हटले, तर खरीखुरी आहेत किंवा फास्टर फेणेप्रमाणे प्रणवच्या भासविश्वातील कल्पनेच्या भराऱ्या आहेत. रमा ही प्रेयसी आहे, पत्नी आहे. प्रणवचा मृत्यू होणार हे कळताच, त्याच्याशी ती हट्टाने लग्न करते. शेतातले चतुर पकडून, त्यांना दोरे बांधून काडेपेटीत ठेवायचे आणि हवे तेव्हा उडवायचे, हा प्रणवच्या दोस्तांचा खेळ नकळतपणे प्रणवच्या वयात येण्याचे प्रतीक बनतो. कादंबरीच्या अखेरीस प्रणवला मेट्रोमधून उतरताना आपणच चतुर झाल्याचा भास होतो. कप्प्यातून बाहेर पडणे, आता त्याला अपरिहार्य असते.

ही कादंबरी मेटाफिक्शन आहे, असे म्हणण्याचे कारण असे, की ती स्वतःच स्वतःचा रचनाबंध तपासून पाहते. उदाहरणार्थ, याची प्रस्तावना कृष्णाजी शहाणे या काल्पनिक व्यक्तीने लिहिली आहे. म्हणजे प्रस्तावना, तिचा लेखक हेदेखील फिक्शनचाच एक भाग बनतात. रमा कादंबरीमध्ये पात्र म्हणून येते आणि मजकुराची भर टाकत बाहेरून हस्तक्षेप करते. कादंबरीचा नायक प्रणव आणि लेखक प्रणव एकमेकांना तपासून पाहतात. पात्रांचे हे द्वैती अस्तित्व आणि आपण कल्पिताचे भाग आहोत, याची निवेदक अथवा पात्रांना सतत जाणीव असणे, हे मेटाफिक्शनमध्येच घडू शकते. वास्तवाचे आकलन होण्यासाठी कला आणि जीवन, कल्पित आणि भौतिक यांच्यातील नाते तपासून पाहणे, हे या कादंबरीत पदोपदी घडते.

एका ठिकाणी आयुष्याला पेन ड्राइव्हची उपमा दिलेली आहे. त्यात अनेक फाइल असतात. एक कोडे म्हणून, एक सल म्हणून त्या पडून राहतील आणि विश्वाच्या पोकळीत हरवूनही जातील. या कादंबरीतील पात्रेही एक साधन बनतात. इतकेच नव्हे, तर यातील कथनपद्धती कधी प्रसंगवर्णन, कधी कल्पनाविलास, कधी पत्रलेखन अथवा जातक कथेचे रूप घेऊन येते. त्यासाठी वेगळे मुद्राक्षरांचे टंक अथवा फाँट वापरले जातात. यातून रचनाबंधाच्या शक्यता तपासल्या जातात.

या कादंबरीचा तात्त्विक आशय असलाच, तर तो मृत्यूला नवी सुरुवात मानणारा आहे. एका अवस्थेतून दुसऱ्यात परिवर्तन आणि बदल हे त्याचे स्थायीभाव आहेत. आजच्या आभासी विश्वाचे त्याला संदर्भ आहेत. आजच्या पिढीचे वास्तवाचे आकलन त्यात आले आहे.

  • दीपक घारे

चतुर
लेखक : प्रणव सखदेव
प्रकाशक : रोहन प्रकाशन
पाने : १४८, किंमत : २४० रु.

परिक्षणाची लिंक – https://marathi.indiatimes.com/editorial/samwad/chatur-is-the-third-novel-by-pranav-sakhdev/articleshow/102054820.cms?fbclid=IwZXh0bgNhZW0CMTAAAR1sHhsdmj1-ca8pZjuoLl712oK_bMMp1QC9JEJlfn9tdRrAomE65VLEhhA_aem_AUBaYat8Ep3RJEdimK_j4uJP3O7S_S47R7___Ue5jj1XOH1YsvsSj92W2uwi2ZGo7fiHGTa-qEigN7jXWlK-zjeU


 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *