संतोष वरधावे

महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी असणाऱ्या, सुप्रसिद्ध उर्दू कथाकार जोगेंद्र पॉल यांच्या प्रेरणेने संतोष वरधावेंनी विद्यार्थीदशेपासूनच कथालेखनाला सुरूवात केली. महाविद्यालयीन जीवनात लिहिलेल्या त्यांच्या कथांचा 'मदारी' हा संग्रह, महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत यापूर्वी १९९५ सालीच प्रकाशित झाला आहे. वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी, मानसशास्त्रातील पदव्युत्तर पदवी आणि कायद्याचे स्नातक असलेले वरधावे पेशाने प्राध्यापक आहेत. इंग्रजी साहित्याचा व्यासंग असणाऱ्या या लेखकाने अनुवादित लिखाणही केले आहे. वन्यजीवन, पुरातत्व, इतिहास, मानववंशशास्त्र, संरक्षण, परामानसशास्त्र यासारख्या भिन्न विषयांत असलेली रुची त्यांच्या लेखनात प्रतिबिंबित झालेली दिसते. घेतलेल्या अनुभवांना संवेदनशीलपणे दिलेले कथात्मरूप, वास्तववादी लेखणीने जिवंत केलेले मानवी दुःख, वैविध्यपूर्ण कथावस्तू, लोकविलक्षण व्यक्तीरेखा, कलाटणीवजा शेवट अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असलेल्या कथांचे, विविध नियतकालिकांतून, ते सातत्याने लेखन करताहेत. कथालेखनाच्या बरोबरीने ललित गद्य, माहितीपर लेख, व्यक्तीचित्रणं, एकांकिका यासारखे लेखनप्रयोगही त्यांनी केले आहेत. Email: vardhavesantosh14@gmail.com