आपण का वाचतो, त्यातून आपल्याला काय मिळतं आणि मग हळूहळू आपला वाचनप्रवास कसा घडत जातो, कसा अधिकाधिक प्रगल्भ होत जातो याचा नेमका वेध घेणारा तरुण वाचक हर्षद सहस्रबुद्धे यांचा खास लेख. निमित्त अर्थातच जागतिक पुस्तक दिनाचं!


‘वाचन-संस्कृती’ची आपल्याशी जुळलेली नाळ, ही रंग, अक्षरं तसेच आकृत्यांची ओळख, चित्रवाचन इत्यादी स्वरूपात असते. अगदी लहान वयापासून आपला संबंध रंग व आकृत्यांशी येत असतो. अक्षरं, लिपी यासुद्धा आकृत्याच असतात की! लहानपणी पालक, शिक्षक, नातेवाईक इत्यादींनी आणून दिलेली अवांतर वाचनाची पुस्तकं, अभ्यासाची पुस्तकं, दूरदर्शन आणि भोवतालची माणसं, त्यांचे व्यवहार, या सगळ्यातून आपलं ‘वाचन’ सुरू होतं. हळूहळू आकार घेऊ लागतं. जसजसं वय वाढतं तसतशी अनुभवांची शिदोरी वाढत जाते. ‘आपल्याला नक्की काय आवडतं’ हे जरा जरा कळू लागतं. विद्यार्थीदशेत असताना अवांतर वाचन बऱ्यापैकी कमी असतं. केलंच, तर ते सुट्टीच्या कालावधीत अधिक होतं. यातही, संस्कारक्षम, आदर्श विषयांवरच्या वाचनाचा वाटा मोठा असतो. सानेगुरुजी, पु. ल. देशपांडे, अत्रे, वपु, प्रकाश संत, भा.रा. भागवत, रोआल डाल, अगाथा, जे. के. रोलिंग, रूडयार्ड किपलिंग, सावरकर इत्यादी बाल/कुमार वाचन गट बऱ्याच जास्त कालावधीकरता चालतो. साधारण आठवी-दहावीच्या सुमारास विज्ञानकथा, आत्मचरित्रं, परीकथा, रहस्यकथा वगैरे काही नवी दालनं उघडू लागतात. ही दालनं जसजशी उघडतात, साधारण त्याच सुमारास अभ्यासाचा आवाकाही वाढत जातो. वाचनाचे ढोबळमानाने तीन प्रकार पडतील. ‘वाचावं लागतं’, म्हणून केलेलं वाचन. ‘हे वाचल्याशिवाय गत्यंतरच नाही’, म्हणून केलेलं वाचन आणि ‘स्वान्तसुखाय’ केलेलं वाचन.

से अनेक लेखक आहेत, त्यांच्या अजरामर कलाकृती आहेत, ज्यांचा नाव-पत्ता देखील आपल्याला नीट ठाऊक नाही. असं का? हे आपल्या हातून घडलंच कसं? असं विचारत, आपण जेव्हा स्वत:शीच झगडू लागतो, तेव्हा आपलं वाचन ‘डोळस’ होण्याच्या मार्गावर असतं.

‘वाचावं लागतं’, या प्रकारात रोजच्या बातम्या येऊ शकतील, फेसबुक, व्हॉटसअॅप तसेच कोरा इत्यादी संकेतस्थळांवर केलं जाणारं, सहजी नजरेस पडणारं वाचन येऊ शकेल किंवा एखाद्या परीक्षेच्या अथवा इतर कोणत्या निमित्ताने केलं जाणारं, तात्पुरतं केलं जाणारं वाचन येऊ शकेल. शालेय अथवा महाविद्यालयीन अभ्यासक्रम किंवा स्पर्धा परीक्षा तयारी अथवा व्यवसाय-उद्योग किंवा नोकरीच्या दृष्टीने उपयुक्त असणारं वाचन, हे, ‘वाचल्याशिवाय गत्यंतरच नाही’ या विभागात येऊ शकेल. ‘स्वान्तसुखाय’ केलं जाणारं वाचन हे सर्वार्थाने आनंद देणारं असतं असं मला वाटतं. पुस्तकं, मासिकं, वृत्तपत्रं यांतून भेटीस येणारं छापील साहित्य; सामाजिक संकेतस्थळं, फोन, किंडल, संगणकावर आढळून येणारं इलेक्ट्रॉनिक स्वरूपात उपलब्ध असणारं साहित्य किंवा निसर्गवाचन, आजूबाजूच्या व्यक्तींचं, वस्तूंचं वाचन, चित्रवाचन इत्यादी अनेक स्वरूपांतलं वाचन आपण करत असतो. अभ्यासाच्या वाढत्या आवाक्याबरोबर, ‘हे वाचल्याशिवाय गत्यंतरच नाही’ हा गट अधिक जोमाने सक्रीय होऊ पाहत असतो. या गटात आणि ‘स्वान्तसुखाय’ गटात कायमच चढाओढ सुरू राहते.

अगदी नोकरी-व्यवसायात बऱ्यापैकी स्थिर होऊन काही वर्षे झाल्यावरदेखील ही चढाओढ सुरू असल्याचं जाणवत असतं. ‘वाचावं लागतं’ गटही कायम सोबत असतो. त्याचा अडथळा फारसा जाणवत नाही इतकंच. पण हा गट देखील, ‘स्वान्तसुखाय’ गटाची जागा बऱ्यापैकी अडवतो. सर्व गटांतल्या वाचनाचा सुयोग्य समतोल राखायची किमया ज्याला साधते, तो खरा ‘रसिक वाचक’ असं मला वाटतं. शालेय दिवसांत आपण जे काही वाचतो, त्यातून आपल्यावर संस्कार घडतात, माहिती आणि ज्ञान मिळतं. एकूणच आकलन विस्तृत होण्याकरता मदत होते. एक ठराविक स्वरूपाची तात्त्विक, वैचारिक बैठक तयार होते. या स्वरूपाच्या मूलभूत बैठकीवर आधारलेलं वाचन पुढे बराच काळ केलं जातं. मग एके दिवशी अचानक असा एखादा टप्पा येतो, ज्यावर असं समजून चुकतं, की, आजवरच्या आपल्या वाचनाची दिशा ही योग्य होती; पण यात बरीचशी सुधारणा आवश्यक आहे. आजवरची वाचनवाट चालताना असे अनेक प्रदेश आहेत, जे आपण पादाक्रांत केलेच नाहीत. असे अनेक लेखक आहेत, त्यांच्या अजरामर कलाकृती आहेत, ज्यांचा नाव-पत्ता देखील आपल्याला नीट ठाऊक नाही. असं का? हे आपल्या हातून घडलंच कसं? असं विचारत, आपण जेव्हा स्वत:शीच झगडू लागतो, तेव्हा आपलं वाचन ‘डोळस’ होण्याच्या मार्गावर असतं. या टप्प्यावर, जर आपल्या हातात मुबलक वेळ असेल, आपण पुरेसे सजग असू आणि ‘स्वान्तसुखाय’ व इतर गटांचा समतोल साधायचा कसा हे आपल्याला उमजू लागलं असेल, तर आपण वाचनवाटेवर आलेला नवा फाटा पाहू शकतो.
इतकंच नव्हे, तर फाट्यावर योग्य ती बाजू निवडून चालतो आणि या सर्व फाट्यांवरून फेरफटका मारत येत असतानाच मूळ वाट सोडत नाही. तिची दिशा विसरत नाही. नंतर येणाऱ्या प्रत्येक वळणावर आपण पुरेसे सजगपणे पुढे गेलो आणि समोरची चढण चढत राहिलो तर एका ठराविक उंचीवर आपल्या लक्षात येतं की, आता आपण पुरेसे डोळस झालो आहोत. चढून आलो ती वाट आणि चढणीवरची पुढची वाट आपल्याला परिचित भासते. मागच्या आणि पुढच्या वाटांवरचे अनेक चकवे आपल्याला लख्खपणे दिसतात. ठराविक संस्कार आणि तात्त्विक जडणघडणीवर आधारलेली निवड सोडून आपण अनोळखी प्रांतात फेरफटका मारून येतो. कधी एखाददुसरी वळणं चुकतातही, परंतू बरीचशी बरोबर येतात.

Harshad-Sahasrabudhe

एकंदर हिशोब पाहता, ‘आज’च्या साहित्याची अथवा एकंदरच ‘वाचन’ या गोष्टीची नाडी अचूक ओळखली आहे असं वाटत असतानाच, अशी काही पुस्तकं सापडतात, अशी काही मंडळी भेटतात, जी आपल्या वैचारिक अधिष्ठानाला हादरे देऊ लागतात. पुन्हा एकदा अधिक सजग, अधिक डोळस होण्याची गरज भासू लागते. मी वाचनातून काय मिळवलं व मला आता, इथून पुढे काय मिळवलं पाहिजे हा प्रश्न परत त्रास देऊ लागतो. या प्रकारचा सल जाणीवपूर्वक जोपासावा लागतो. हीसुद्धा मोठी अवघड कसरत असते. पण ती केल्याचे फायदेही खुप असतात. ‘आपल्याला मोर हवा आहे ना? मग आपणच मोर व्हायचं’ असं रेगे त्यांच्या ‘सावित्री’मधे म्हणतात. ‘मोर होणं’ ही गोष्ट सोपी नाही. याकरता तपश्चर्या करावी लागते. श्रम पडतात. खर्ची पडावे लागते. हे एक प्रकारचे गिर्यारोहणच. वर जाताना अपार कष्ट. एका अफाट,अमर्याद उंचीवर पोहोचल्यावर जाणवणारा एकान्त. या उंचीवर विराजमान असूनही कधीतरी का होईना पण उतरावं लागतंच याचं दु:खही होतंच. जी.ए. कुलकर्णींना लिहिलेल्या एका पत्रात सुनीताबाई म्हणतात, की, कलाकृती तीच असते, पण तिचा पुनर्प्रत्यय घेणारे आपण मात्र तेच राहिलेलो नसतो. आपण सर्वप्रथम जी गोष्ट वाचली, अनुभवली तेव्हाचे आपण आणि आत्ताचे आपण यांत मोठं अंतर असतं. न जाणवणारं. कधी अशा पुनर्प्रत्ययाकरता वाचावं, तर कधी अपरिचित प्रांत माहीत करून घेण्याकरता. कधी लिहिण्याकरता, तर कधी निर्हेतुकपणे वाचावं. एक आस्वादक बनून. ‘मोर होणं’ ही अनंत काळाकरता चालणारी एक अजब गोष्ट आहे. पण ‘आपण मोर व्हायचं’ ठरवलं, तर हे सगळं फारसं कठीण वाटत नाही.

-हर्षद सहस्रबुद्धे

पूर्वप्रसिद्धी : रोहन साहित्य मैफल एप्रिल २०१९


Neeteen-vaidya
तुम्हाला हेही वाचायला आवडेल…

मरू घातलेल्या मूल्यव्यवस्थेची कादंबरी (नीतीन वैद्य)

महात्मा गांधी, साने गुरुजी आदींचे संस्कार अजून शिल्लक असलेल्या सपकाळ सरांच्या व्यवस्थेविरोधातल्या संघर्षाची ही कथा.

लेख वाचा…


जगण्याचं भान देणारी काही पुस्तकं…

विंचवाचं तेल

पारधी समाजातली मी… माझी ही ज्वलंत जिंदगानी


सुनिता भोसले

प्रशांत रुपवते


‘विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’विरुद्ध वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलीस खातं आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करावेत यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतं.
आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येते आणि प्रचंड दाह होतो. तुमची सृजनताच मारून टाकायची… उद्ध्वस्त करायची…
पोलीस डिपार्टमेंटचं हे विंचवाचं तेल या समाजव्यवस्थेने… या संस्कृतीने साऱ्या बहुजन समष्टींसाठी विशेषत: दलित भटक्या-विमुक्तांविरुद्ध नाना रूपात वापरलंय… तर याच समष्टीतील ही पोर… सुनीता भोसले… पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत तिचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर… तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला… तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा!
समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न वयाच्या अकराव्या वर्षापासून करणाऱ्या या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी… विंचवाचं तेल !


300.00 Add to cart
Featured

नाइन्टीन नाइन्टी


सचिन कुंडलकर


आघाडीचा चित्रपट-दिग्दर्शक, संवेदनशील लेखक

सचिन कुंडलकर…

या पुस्तकातल्या ललित लेखांमधून देतोय, जगाकडे पाहण्याचा

एक वेगळा दृष्टिकोन… नाइन्टीन नाइन्टी !



340.00 Add to cart

आधुनिक भारताचे विचारस्तंभ


रामचंद्र गुहा

अनुवाद : शारदा साठे


रामचंद्र गुहा यांचं नवं पुस्तक
‘भारत’ ही संकल्पना उलगडणारा ग्रंथ
MAKERS OF MODERN INDIA आता मराठीत
राममोहन रॉय, सय्यद अहमद खान, जोतीराव फुले, ताराबाई शिंदे, बाळ गंगाधर टिळक, रवींद्रनाथ ठाकूर, गोपाळ कृष्ण गोखले, महम्मद अली जीना, भीमराव आंबेडकर, ई.व्ही. रामस्वामी, राममनोहर लोहिया, एम.एस. गोळवलकर, मोहनदास गांधी, कमलादेवी चट्टोपाध्याय, जवाहरलाल नेहरू, जयप्रकाश नारायण, चक्रवर्ती राजगोपालाचारी, व्हेरियर एल्विन, हमीद दलवाई या १९ विचारवंतांच्या व्यक्तिरेखा व वैचारिक भूमिका यांचा एकाच ग्रंथातून परिचय करून देणारं व त्यातून भारताची वैचारिक जडणघडण स्पष्ट करणारं पुस्तक.



800.00 Add to cart

वॉर्ड नंबर पाच, केईएम

डॉ. रवी बापट

सुनीती जैन


ही सारी कहाणी आहे केईएम हॉस्पिटलमधील ‘वॉर्ड नंबर पाचची’. वैद्यकीय व्यवसायात असताना डॉ.बापट यांना आलेले अनुभव, उपचारादरम्यान भेटलेले विविध प्रकारचे रुग्ण, डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉईज…
डॉक्टरने रुग्णाकडे केवळ शास्त्रीय दृष्टिकोनातून आणि पुस्तकी ज्ञानातून पाहणं पुरेसं नाही. रुग्णाचं मन, त्याचा स्वभाव, त्याच्या भोवतालचं वातावरण हे समजून घेवून त्यांच्याशी संवाद साधून मगच उपचार करणं डॉ.बापट यांना गरजेचं वाटलं. शरद पवार ते सतीश राजे, दादा कोंडके ते दत्तू मिस्त्री, रुग्ण कुणीही असो त्याची पत-प्रतिष्ठा न पाहता शल्यचिकित्सक डॉक्टर बापटांनी सारख्याच आपुलकीने उपचार केले. अशा सर्व अनुभवांविषयी…



395.00 Add to cart

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *