स्त्रीजीवनाचा अभ्यास करताना भारतीय समाजातील पुरुषी मनोवृत्तीच्या अनेक खुणा, पितृप्रधानतेचे अनेक पैलू सातत्याने पुढे येतात आणि त्यातील केंद्र बहुधा पुरुषांनी केलेले अत्याचार, स्त्रीचं शोषण हेच असतं. 'ती'चं अवकाश या पुस्तकात मात्र बारा जणींच्या अशा बारा कहाण्या आहेत, ज्यातून स्त्रियांनी स्वत:चा वेगळा मार्ग तर शोधला आहेच, पण इतरांना विचारप्रवृत्त करणाऱ्या हकीगतीही सांगितल्या आहेत. आपापल्या कुटुंबातील नातेसंबंधांचा शोध घेताना त्यांनी विशेषत: आपल्या आधीच्या तीन पिढयांमधील स्त्रियांनी आपल्या अस्तित्वासाठी केलेला संघर्ष आणि स्वत:साठी मिळवलेला पैस यांचं चित्रण केलं आहे. जवळ जवळ एका शतकातील स्त्रियांचं कुटुंबातील स्थान, त्यांची सामाजिक स्थिती यांचं वास्तव प्रतिबिंब यात दिसतं. वैयक्तिक अनुभवांवर आधारित या कथनांमध्ये सामाजिक इतिहासाबरोबर भावनिक बंधही गुंतलेला आहे व त्यामुळे त्या कहाण्या अधिक रोचक व हृद्य झाल्या आहेत. आजी, आई, आपण स्वत: व आपल्या मुली यांच्या नात्यांमधील हा गोफ सामाजिक इतिहासाचं एक अस्सल साधन तर आहेच, पण स्त्रीअभ्यासाचा एक लक्षणीय पैलू म्हणूनही त्याचं महत्त्व आहे.
या बारा जणींचं कर्तृत्व कोणत्या भक्कम आधारावर उभं आहे व त्यांच्या स्वातंत्र्यासाठी कोणती किंमत दिली गेली आहे याचं सम्यक दर्शन या कथनांद्वारे घडतं. या सार्या कहाण्या यशस्वितेच्याच आहेत असं नाही, पण आईचा वा आजीचा अयशस्वी संघर्षही पुढच्यांना प्रेरक ठरणारा आहे. वेगवेगळया प्रदेशांतून, भिन्न आर्थिक स्तरांतून व भिन्न सांस्कृतिक वातावरणातून आलेल्या या लेखिका स्वानुभवकथनाबरोबरच सांस्कृतिक बदलांचंही दर्शन घडवतात. स्त्रीजीवनाच्या, स्त्रीसमस्यांच्या अभ्यासकांना या पुस्तकाने नवी सामग्री पुरवली आहे.